टेंभुर्णी : शेतकऱ्यांना तीन, पाच व साडेसात एचपी वीज मोफत देण्यात आहे. शेतकऱ्यांचे मागचे वीजबिल माफ करण्यात येणार असून यापुढे शेतकऱ्यांना फक्त दिवसा वीज देणार येणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. टेंभुर्णी येथील पुष्पक मंगल कार्यालयात रविवारी (दि.२२) दुपारी 'जनसन्मान यात्रेचे' आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, लाडकी बहीण योजनाच्या माध्यमातून सरकारला महिलांना सक्षम करायचे आहे. महिलांना काय घ्यायचे असेल तर पैशाअभावी मुरड घालावी लागते. एक कोटी साठ लाख महिलांना रक्कम मिळाली असून कोणी राहिले असल्यास आणखी फार्म भरून द्या, असे सांगत ही योजना काहींना पटत नसल्याने सरकार आले तर योजना बंद होईल, असे म्हणत आहेत. १० वेळा अर्थसंकल्प सादर केला असून ही योजना बंद होणार नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. मोफत वीज, मुलींना फ्री शिक्षण, एक रुपयात पीकविमा, सारथी अमृत योजना, महाज्योति योजना या योजनाद्वारे सर्व घटकांना न्याय देण्याचा सरकार प्रयत्न असल्याचेही पवार यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर, आ.संजयमामा शिंदे, कल्याणराव काळे, रणजितसिंह शिंदे, समन्वयक लतीफ तांबोळी, वामनराव उबाळे, संजय पाटील-भिमानगरकर, तुकाराम ढवळे, सुहास पाटील-जामगावकर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.