सोलापूर : …तर आम्हीपण तुमच्या गटात येतो! शहाजीबापू पाटील यांचा गौप्यस्फोट | पुढारी

सोलापूर : ...तर आम्हीपण तुमच्या गटात येतो! शहाजीबापू पाटील यांचा गौप्यस्फोट

सागोला; पुढारी वृत्तसेवा : शिंदे गटाचे समर्थक शहाजीबापू पाटील यांनी जळगाव येथील सभेतून राष्ट्रवादी काँग्रेसह ठाकरे गटाच्या आमदारांवर जोरदार टीका केली आहे. ठाकरे गटातील आमदार आम्हाला रात्री फोन करतात आणि न्यायालयाच्या निकालानंतर आम्हीही तुमच्या गटात येतो असे म्हणतात, असा खुलासा शहाजीबापू पाटलांनी केला आहे. आम्ही शिवसेनेचे काहीही वाटोळं केले नाही. उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या जागी आम्ही शिवसेनेचेच नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आहे, असेही पाटील म्हणाले.

बंडखोर आमदारांचा उल्लेख ‘गद्दार’ करण्यावरूनही शहाजीबापू पाटलांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे. आम्ही 50 जण बाजीगर होतो. त्यामुळे आम्हाला गद्दार म्हणायच्या भानगडीत पडू नका. आम्ही बाजीगर होतो, जातीवंत होतो, मरणाला न घाबरणार्‍या आमच्या औलादी होत्या. त्यामुळे आमदारकी आमच्यासाठी गौण आहे. माणसाने प्रामाणिक असावे, हा खरा प्रश्न आहे. आमदारासाठी सगळ्यात आधी जनता असते, त्यानंतर नेता आणि मग पक्ष. सगळ्यात आधी जनतेशी प्रामाणिक राहिले पाहिजे, कारण याच जनतेने तुम्हाला मुंबईला पाठवलेले असते.

जनताच तुमच्या पाठीशी नसेल तर शहाजीबापू पाटीलही मुंबईला जाऊ शकत नाही. आम्हाला घरात बसावे लागले असते. तुम्हीच आम्हाला मुंबईला पाठवले. त्यामुळे तुमच्या सुख-दु:खाशी आमची नाळ जोडली आहे. तुमचे प्रश्न सोडविण्यासाठीच आम्ही हे पाऊल टाकले आहे. याकडे मोठ्या अंत:करणाने आणि मोठ्या मनाने बघा, असे शहाजीबापू पाटील म्हणाले.

सध्या 50 आमदार एका बाजूला आहेत आणि 13-14 आमदार तुमच्याकडे आहेत. त्यातले सात-आठजण आम्हाला रात्री फोन करतात, न्यायालयाचा निकाल लागला की आम्हीपण तुमच्या गटात येतो, असे म्हणतात. ते केवळ न्यायालयाच्या निकालाची वाट बघत आहेत, असा गौप्यस्फोट शहाजीबापू पाटील यांनी केला आहे.

Back to top button