सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या प्रतापगड किल्ल्याची नोंद जागतिक वारसास्थळांच्या यादीत होण्यासाठी ‘युनेस्को’चे नामांकन महत्त्वाचे ठरणार असून त्यासाठी ‘युनेस्को’ची टीम प्रतापगड किल्ल्याची पाहणी करण्यासाठी येणार आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि स्वराज्याची चौथी राजधानी असलेला अजिंक्यतारा किल्ला दुर्लक्षित राहिला असून या किल्ल्याचाही विकास करावा, अशी मागणी इतिहासप्रेमींतून होत आहे. त्यामध्ये प्रतापगड किल्ल्याबरोबरच स्वराज्याची पहिली राजधानी असलेला रायगड, खांदेरी (जि. रायगड), सिंधुदुर्ग व विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग), शिवनेरी, लोहगड व राजगड (जि. पुणे), पन्हाळा (जि. कोल्हापूर) या किल्ल्याचा समावेश आहे.
प्रतापगड किल्ल्याचा विकास करण्यात येत आहे. ढासळलेले बुरुज, तटबंदीची पुन्हा ऐतिहासिक पद्धतीने उभारणी करण्यात येणार आहे. पर्यटकांसाठी आवश्यक सुविधाही उपलब्ध केल्या जाणार आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तयार केलेला प्रतापगड किल्ल्याचा विकास आराखडा राज्य शासनाने नुकताच मंजूर केला असून कामही सुरू झाले आहे. या किल्ल्याची नोंद जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट होण्यासाठी युनेस्कोचे नामांकन महत्वाचे आहे. राज्यातील अकरा किल्ल्यांची पाहणी करण्यासाठी युनेस्कोची टीम ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात दाखल होणार आहे.
स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी केला होता. आजही हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देतो. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अजिंक्यतारा किल्ल्याला इतिहासात वेगळेच महत्त्व आहे. याही किल्ल्याचा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विकास आराखडा तयार केला आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्हा नियोजनमधून 5 कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. सातारा पालिकेने या किल्ल्यावर जाणारा मार्ग काँक्रिटचा केल्याने इतिहासप्रेमी तसेच सातारा शहरातील नागरिकांची किल्ल्यावर वर्दळ वाढली आहे. मात्र, किल्ल्याचे बुरुज, तटबंदी, दर्शन भाग, ऐतिहासिक सदर, राजवाडा, मंदिरे, पाण्याची तळी यांची उभारणी व पुनरुज्जीवन त्याच धर्तीवर होणे आवश्यक आहे.