सातारा : सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी परतीच्या पावसाने थैमान घातले असल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, घेवडा, मूग, चवळी, वाटाणा यांसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक पावसामुळे वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सातारा जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे सर्वत्र धो धो पाऊस पडत असल्याने पाण्याचे लोटच्या लोट वाहताना दिसत आहेत. मंगळवारी दुपारी सातारा शहरासह जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले. पावसाच्या जोरदार जरी झाल्याने सखल भागात पाणी साचून राहिले. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. जिल्ह्याच्या बहुतांश भागात पाऊस झाल्याने शेतीमध्ये पाणी साचू लागले आहे.
सध्या जिल्ह्यात खरीप हंगामातील घेवडा, वाटाणा, मूग, चवळी यासारखी कडधान्य पिकांची काढणी सुरू आहे. मात्र, गेल्या 3 ते 4 दिवसापासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे काढणीस आलेली कडधान्यांची पिके भिजून गेली आहेत. त्यामुळे या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. तर काही ठिकाणी अगाप सोयाबीन पिकेही काढणीस आली आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पिक पावसामुळे वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे. शेतकर्यांनी बँका, पतसंस्था, सोसायट्यांची कर्जे काढून खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली मात्र, काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने पिके वाया गेली असल्याने शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक कोंडीत सापडला आहे.
खटाव : खटाव, जांब, बिटलेवाडीसह तालुक्याच्या उत्तर भागात मंगळवारी तुफान पाऊस झाला. खटावला ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने यावर्षीचा सर्वात सुपर डुपर हिट शो दाखव ,अर्धा तास ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. गेल्या तीन दिवसांपासून खटाव तालुक्याच्या विविध भागात पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. मायणी परिसराला सलग तीन दिवस झोडपून काढल्यानंतर पावसाने तालुक्याच्या उत्तर भागाकडे मोर्चा वळवला आहे. मोळ, डिस्कळ परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजता खटावध्ये अचानक तुफान पावसाला सुरुवात झाली. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह अर्धा तास ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. खरिपाच्या सुगीत मग्न असलेल्या शेतकर्यांची अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली. शेतातही सर्वत्र पाणी साचले होते. परिसरातील ओढ्यांनाही पाणी आले.
तालुक्याच्या उत्तर भागातील मोळ, डिस्कळ, मांजरवाडी, बुध, ललगुण परिसरातही गेल्या दोन दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे. जांब, बिटलेवाडी, जाखणगाव भागातही मंगळवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. सोयाबीन,घेवडा या नगदी पिकांची काढणी सुरु असताना पाऊस आल्याने काही शेतकर्यांचे नुकसानही झाले.