सातारा : सातारासह जिल्ह्यात ठिकठिकाणी परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. सर्वत्रच पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कोयना, उरमोडी, कण्हेर, धोम, वीर धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत असल्याने कृष्णा, वेण्णा, उरमोडी, निरा नद्या दुथडी वाहू लागल्या आहेत.
जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. जोरदार पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर आले आहेत. रस्त्यावरून पाण्याचे लोटच्या लोट वाहताना दिसत आहेत. तर काही रस्त्याना ओढ्याचे स्वरुप आले आहे. राज्यमार्ग, महामार्गासह जिल्हा मार्गावरील रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. शहर व परिसरातील वर्दळीचे रस्तेही खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यामुळे छोटे-मोठे अपघातही घडू लागले आहेत.
सततच्या पावसामुळे शेतातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तर काही शेतात पाण्याची तळी निर्माण झाली आहेत. बहुतांश ठिकाणी शेतात पाणी साचले असल्याने पाण्यामुळे पिके सडून गेली आहेत. तर काही ठिकाणी पिके पिवळी पडली आहेत. सध्या खरीप हंगामातील घेवडा, चवळी, मूग, वाटाणा, धना, सोयाबीन आदी पिकांची काढणी युध्दपातळीवर सुरू आहे. अशातच जोरदार पावसाच्या सरी कोसळत असल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने बळीराजा धास्तावला आहे. धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. उरमोडी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. धरणाच्या सांडव्यावरुन पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे उरमोडी नदी पात्रात पाण्याची वाढ होत आहे. कुणीही नदी पात्रात प्रवेश करु नये. उरमोडी नदी काठावरील प्रशासन व ग्रामस्थांनी याबाबतची दक्षता घ्यावी. कण्हेर धरणाच्या विद्युत ग्रह व सांडव्यावरुन वेण्णा नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. वीर धरणातून 14 हजार 761 क्युसेक निरा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे नद्यांना पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी दिवसभर जिल्ह्यात ऊन पावसाचा खेळ सुरू होता.