जिल्हा बँक निवडणूक : जावळीत १४४ कलम लागू; तहसीलदार राजेंद्र पोळ | पुढारी

जिल्हा बँक निवडणूक : जावळीत १४४ कलम लागू; तहसीलदार राजेंद्र पोळ

कुडाळ; पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्हा बँकेसाठी झालेल्या मतदानाचा निकाल उद्या (दि. २३) रोजी जाहीर होणार आहे. या पार्श्वभुमीवर जावळी तालुक्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. (जिल्हा बँक निवडणूक)

या तालुक्यात निवडणूकीदरम्यान आमदार शशिकांत शिंदे, ज्ञानदेव रांजणे आणि वसंतराव मानकुमरे गटात जोरदार वादावादी झाली होती. त्यामुळे तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी १४४ कलम लागू केल्याची माहिती जावळीचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी दिली.

या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर गेल्या आठ दिवसांपासून राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने या तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. यातूनच या ठिकाणी तणावाचे वातावरण तयार झाले होते. (जिल्हा बँक निवडणूक)

तालुक्यात १४४ कलम लागू झाल्याने, पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाणार आहे. त्याशिवाय निकालानंतर मिरवणूक, जल्लोष अथवा गुलालाची उधळण अशा कृती करता येणार नाहीत. या कालावधीत कोणीही कायदा-सुव्यवस्थेचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा तहसीलदार पोळ यांनी दिला आहे.

हे ही वाचा :

Back to top button