भूस्खलन 7 गावांच्या पुनर्वसनासाठी 4 कोटी | पुढारी

भूस्खलन 7 गावांच्या पुनर्वसनासाठी 4 कोटी

सणबूर ः पुढारी वृत्तसेवा मागील वर्षी जुलै महिन्यात अतिवृष्टी व भूस्खलन होऊन सात गावातील लोकांना मोठा धोका निर्माण झाला होता. अजूनही हा धोका कायम असल्याने या गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी आवश्यक जागा खरेदीसाठी राज्य शासनाने 4 कोटींची तरतूद केली आहे. आमदार शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये मागील वर्षी भूस्खलनामुळे मोठी जिवित व वित्त हानी झाली होती. त्यानंतर आंबेघर खालचे, आंबेघर वरचे, ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी (जिंती) या सात गावांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करणे आवश्यक बनले आहे. त्याबाबत आमदार शंभूराज देसाई यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही याबाबत विनंती करण्यात आली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी उच्चस्तरीय बैठक होऊन यात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. धोकादायक सात गावांचे कायमस्वरूपी सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने खाजगी जमीन खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेल्या 4 कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सदर बैठकीला अप्पर मुख्य सचिव (महसूल) नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिम कुमार गुप्ता, वित्त विभागाच्या सचिव श्रीमती ए. शैला, साताराचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पाटणचे उपविभागीय अधिकारी सुनिल गाडे यांच्यासह संबंधित अन्य सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अध्यक्षतेखाली या बैठकीमध्ये खाजगी जमीन खरेदीसाठी 4 कोटीचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीतून तात्काळ देण्याचे निर्देश दिले. जमीन खरेदीसाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी. या गावामध्ये 550 घरे नव्याने उभारण्याच्या कामाला गती देत कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्‍न मार्गी लागला पाहिजे. तसेच त्यासाठी आवश्यक असणार्‍या सर्व समन्वय यंत्रणांनी गतीने काम करावे, असे निर्देशनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत उपस्थित अधिकार्‍यांना दिले आहेत.

Back to top button