सातारा : पर्यटक दांपत्यास सिनेस्टाइल मारहाण | पुढारी

सातारा : पर्यटक दांपत्यास सिनेस्टाइल मारहाण

महाबळेश्वर, पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वर शहरापासून एक किमी अंतरावर असलेल्या मेढा-सातारा परिसरातील निर्जन रस्त्यावर पर्यटक दांपत्यावर हल्‍ला करण्यात आला. दुचाकीवरून आलेल्या तिघा अज्ञात हल्लेखोरांनी रॉडने मारहाण केली. हे पर्यटक दांपत्य आपल्या वाहनाने रिसॉर्टमधून बाहेर पडल्यानंतर काहीच अंतरावर हा हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये पर्यटक दांपत्य जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

मात्र पर्यटकाने आमची कुणाबद्दल कोणतीही तक्रार नसल्याचा जबाब पोलीस प्रशासनास दिला. त्‍यामूळे याबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून पर्यटकाचे ”तेरी भी चूप मेरी भी चूप”चे धोरण चर्चेचा विषय बनला आहे. तर शांतताप्रिय महाबळेश्वरात अशाप्रकारचा भयंकर हल्ला होण्याची घटना शहरात चर्चा विषय होऊन गेली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, महाबळेश्वर पर्यटनास लोणी काळभोर, पुणे या भागातून एक पर्यटक दांपत्य तीन दिवसांपूर्वी महाबळेश्वर पर्यटनास आले होते. ते शहरानजीक एका रिसॉर्ट मध्ये वास्तव्यास होते. रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हे पर्यटक दांपत्य मेढा-सातारा परिसरातील निर्जन रस्त्यावरून आपल्या वाहनाने निघाले असता मागून दुचाकीवरून तिघे अज्ञात हल्लेखोर आले. आणि त्यांनी या पर्यटकाच्या वाहनाचा प्रथम रस्ता अडवला व रॉडने वाहनाची काच फोडली. त्यानंतर गाडीमधील पुरुषास खाली उतरून त्याला प्रथम रॉडने मानेवर व पायावर हल्ला चढविला आणि नजीकच्या जंगलामध्ये ढकलून दिले तर महिलेच्या पायावर रॉडने व लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर अज्ञात हल्लेखोरांनी पलायन केले.

या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेले हे पर्यटक दांपत्य उपचारांसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात गेले. प्राथमिक उपचारांनंतर तेथून ते निघून गेले याबाबतची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून स्थानिक पोलिसांना कळविण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी या पर्यटकांबाबतची माहिती घेऊन ते वास्तव्यास असलेल्या रिसॉर्ट मध्ये या प्रकरणाबाबत माहिती घेण्यास गेले. मात्र या पर्यटक दांपत्याने आमची कुणाबद्दलही-कोणतीही तक्रार नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. या हल्ल्याबाबत पोलीस पूर्णपणे तिऱ्हाहीताच्या भूमिकेत असून या संदर्भात माहिती देण्यास पोलीस देखील असमर्थता दाखवीत आहेत.

हल्ल्याचे कारण काय असावे? पोलिसांकडून या हल्ल्याबाबत कोणतीही शंका व्यक्त केली जात नसून प्रथमदर्शनी तरी या हल्ल्याचे कारण महाभयंकर असल्याचे दिसून येत आहे. हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाला असावा की? राजकीय वैमनस्यातून? की आणखी काही याचे कारण असू शकते? याबरोबरच यात काही काळंबेरं असू शकते का? याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. जखमी झालेले हे दांपत्य सध्या महाबळेश्वर मध्येच आहे.

पाळत ठेऊन हल्ला

पर्यटक दांपत्य हे तीन दिवसांपासून महाबळेश्वरमध्ये वास्तव्यास आहे. हे दांपत्य शनिवारी सकाळी आंबेनळी घाटामधून कोकणाकडे गेले होते. तेथून पुन्हा महाबळेश्वरकडे परतत असताना दुचाकी चालक त्यांचा पाठलाग केला. हा हल्ला पाळत ठेऊनच करण्यात आला आहे, अशी शक्यता असून हल्लेखोरांना संबंधित पर्यटक ओळखत असावेत अशी देखील चर्चा आहे.

Back to top button