तासगाव : पुढारी वृत्तसेवा
गेल्या तीन महिन्यांपासून अतिवृष्टीमुळे तासगाव तालुक्यातील खरिपाच्या पिकांसह द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र या नुकसानीचे पंचनामे होत नव्हते. अखेरीस बुधवारी तहसीलदार अतुल पाटोळे यांनी चार मंडलातील पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती दिली. उर्वरित तीन मंडलातील पंचनामे करण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. माजी सैनिक जोतीराम जाधव आणि शशिकांत डांगे यांचे पंचनाम्याच्या मागणीसाठी होणारे आंदोलन स्थगित करण्यात आले.
तीन महिन्यांपासून तासगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे तालुक्यातील खरीपांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. द्राक्ष बागांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून द्राक्ष बागायतदार हवालदिल झाले आहेत. प्रशासनाने नुकसानीची पंचनामे केले नाहीत. त्यामुळे तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ नुकसानभरपाई मिळवून द्यावी, या मागणीसाठी ज्योतिराम जाधव आणि शशिकांत डांगे यांनी बुधवारपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान तहसीलदार अतुल पाटोळे यांनी तालुक्यातील सावळज, वायफळे, येळावी आणि तासगाव मंडलातील पंचनामे करण्याचे आदेश दिले असून ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहायक यांच्या माध्यमातून पंचनामे करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
उर्वरित मांजर्डे, विसापूर व मणेराजुरी मंडलात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली असून लवकरच उर्वरित मंडळातील पंचनामे करण्यात येणार असल्याचे माहिती तहसीलदार पाटोळे यांनी आंदोलकांना दिली. नुकसानीचे पंचनामे सुरू झाल्यामुळे जाधव आणि डांगे यांनी आंदोलन स्थगित केले. यावेळी सरपंच परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रदीप माने, तुळशीचे सरपंच विकास डावरे, विशाल शिंदे, यशपाल पाटील, पांडुरंग जाधव सम्मेद पाटील, अमित चव्हाण, अमोल कदम, पांडुरंग जाधव, संपत पाटील, सिराज मुजावर उपस्थित होते.