

सांगली : राज्याच्या उद्योग, व्यापार व कृषी विकासासाठी राज्य सरकार व महाराष्ट्र चेंबर यांच्या माध्यमातून एकत्रित प्रयत्न करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत दिली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरच्या अध्यक्षपदी रवींद्र माणगावे यांची नुकतीच निवड झाली. त्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये आमदार राहुल आवाडे, ट्रस्ट बोर्डचे अध्यक्ष आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, माजी वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, संजय सोनवणे, शंकर शिंदे, श्रीकृष्ण परब, गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य ओमप्रकाश अग्रवाल वेदांशू पाटील आदी उपस्थित होते. याप्रसंगी चेंबरच्या शताब्दी कार्यक्रमाबाबत चर्चा झाली.
2027 मध्ये शतकपूर्ती वर्ष साजरे होत असल्याने हा ऐतिहासिक सोहळा महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र चेंबर यांनी संयुक्तपणे आयोजित करावा, अशी विनंती शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर शासन आणि महाराष्ट्र चेंबर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरात विविध उपक्रम राबविण्यासाठी समित्या नेमण्याचे ठरले. इन्व्हेस्टमेंट समित्या, कृषी विकास, उद्योगवृद्धी आणि व्यापारवाढीसाठी उपलब्ध असलेल्या योजनांचा व्यापक प्रचार-प्रसार करण्यासाठी राज्यातील विविध विभागांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्याबाबत चर्चा झाली.
राज्य शासनाने व्यापार्यांना व दुकानदारांना 24 तास दुकाने सुरू ठेवण्याची दिलेली परवानगी हा दूरदृष्टीपूर्ण निर्णय असल्याचे शिष्टमंडळाने नमूद करून शासनाचे आभार मानले.