आंध्र प्रदेशमध्ये तासगाव तालुक्यातील तीन शेतमजुरांचा मृत्यू | पुढारी

आंध्र प्रदेशमध्ये तासगाव तालुक्यातील तीन शेतमजुरांचा मृत्यू

तासगाव; पुढारी वृत्तसेवा : नशेसाठी म्हणून अल्कोहोल मिश्रित विषारी द्रव पिल्याने तीन शेतमजुरांचा मृत्यू झाल्याची घटना अनंतपूर (आंध्र प्रदेश) येथे घडली. हे तिघे तासगाव तालुक्यातील सावळज व सिद्धेवाडी येथील आहेत. सदाशिव सदाकळे (वय 43), दीपक जयसिंग शिरतोडे (वय 44, दोघे रा. सावळज) व भरत नामदेव चव्हाण (वय 42, रा. सिद्धेवाडी) अशी तिघांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, सदाशिव, दीपक व भरत हे तिघे शेतमजूर म्हणून काम करतात. ते अनंतपूर (आंध्र प्रदेश) येथे एका द्राक्ष व्यापार्‍याकडे कामासाठी गेले होते. ते त्याच ठिकाणी राहत होते. गुरुवारी ते तिघे दारू पिण्यासाठी म्हणून अल्कोहोल मिश्रित विषारी द्रव पिले असल्याचे समजते. हे द्रव पिल्यानंतर काही तासात त्या तिघांची प्रकृती बिघडली. शेतातील घरात त्या तिघांशिवाय कोणी नव्हते. त्यांची तब्येत बिघडू लागली. परंतु त्यांना वेळेत वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. या घटनेची माहिती मिळताच द्राक्ष व्यापार्‍याच्या नातेवाईकांनी घटनास्थळी जावून पाहिले. त्यावेळी भरत चव्हाण यांचा मृत्यू झाला होता. इतर दोघांची प्रकृती गंभीर बनली होती. गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना दोघांचाही मृत्यू झाला.

या घटनेची माहिती गुरुवारी रात्री उशिरा मृताच्या कुटुंबियांना समजली. एकाच वेळी तिघांचा मृत्यू झाल्याने सावळज, सिद्धेवाडी परिसरात खळबळ उडाली. शुक्रवारी सकाळी या तिघांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.

Back to top button