आटपाडीतील महिलेचा खून झाल्याचे उघडकीस; तिघांना अटक
आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : आटपाडी येथील मीना बाबासाहेब जावीर (वय 38, रा. विद्यानगर) या महिलेच्या मृत्यूचा तपास करीत असताना तिचा विष पाजून खून केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
रवींद्र बबन पांढरे (वय 33, रा गोटेवाडी, ता. तासगाव), हर्षदा शिवाजी लांडगे ( वय 20, रा. साठेनगर, आटपाडी), योजना दत्तात्रय पाटील (32, रा. धांडोरमळा, आटपाडी) अशी संशयितांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी ः राजेंद्र पांढरे यांची तासगाव येथे शुकमनी नावाची कंपनी आहे. मीना जावीर, हर्षदा लांडगे, योजना पाटील या कंपनीत काम करीत होत्या. मीना जावीर ही आटपाडीतील विद्यानगर येथे भाड्यानेे घर घेऊन राहत होती. ती रवींद्र पांढरे याच्याकडे पगाराव्यतिरिक्त वारंवार पैशाची मागणी करीत होती. कंपनीच्या बैठकीत मीना ही हर्षदा व योजना या दोघींचा अपमान करीत होती. वारंवार होणार्या अपमानाला कंटाळून तिघाही संशयितांनी संगनमत करून मीनाला शीतपेयातून विष पाजून तिला संपवायचा कट रचला. त्यानुसार पांढरे याने हर्षदा व योजना या दोघींकडे विषाची बाटली दिली. दि. 27 जून 2022 रोजी रात्री मीना हिला शीतपेयातून विष दिले. त्यात तिचा मृत्यू झाला. तिचा मृत्यू झाल्याची खात्री पटताच दोघीही घरातून निघून गेल्या.
याप्रकरणी आटपाडी पोलिसात मीना जावीर ही विषारी औषध प्राशन केल्याने मृत झाल्याची नोंद झाली. पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमर फकीर, पोलिस नाईक प्रमोद रोडे, डी.के. ठोंबरे यांनी घटनेचा तपास सुरू केला. याचा तपास करीत असताना मीना हिचा खून झाल्याचे उघड झाले.