पहाटेच्या शपथविधीबाबत मला वाटेल तेव्हाच बोलेन : उपमुख्यमंत्री अजित पवार | पुढारी

पहाटेच्या शपथविधीबाबत मला वाटेल तेव्हाच बोलेन : उपमुख्यमंत्री अजित पवार

मिरज; पुढारी वृत्तसेवा : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत सकाळी घेतलेल्या शपथविधीबाबत मी मला वाटेल तेव्हाच खुलासा करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित ना. पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले.

ना. पवार म्हणाले, मी देवेंद्र फडणवीस यांच्यासमावेत पहाटे नाही तर सकाळी शपथ घेतली होती. ती शपथ का घेतली, याबाबत मला खुलासा आता करावा असा वाटत नाही. ज्यावेळी मला याबाबत खुलासा करावा वाटेल त्यावेळी मी याबाबत खुलासा करेन.

राज ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, भोंग्याचा विषय काढून जनतेच्या हाताला काम मिळणार नाही आणि त्यांच्या रोजीरोटीचाही प्रश्न मिटणार नाही. केवळ राजकीय फायदा व्हावा म्हणून असे प्रकार केले जातात. विरोधी पक्ष बोलतात म्हणून आम्हा सत्ताधार्‍यांनाही त्यावर प्रतिक्रिया द्यावी लागते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील याबाबत शांत होते. त्यांनीही यावर भाष्य केले आहे. पण 21 व्या शतकामध्ये तरुणांना काय सांगितले पाहिजे. याचा विचार सर्वच पक्षातील नेत्यांनी करण्याची गरज आहे. सर्वांनाच जाती धर्माचा आदर असला पाहिजे. दुसर्‍या धर्मातील लोकांना त्रास होईल, अशी वक्तव्ये करू नयेत. घटनेने अधिकार दिले आहेत. पण त्याचा त्रास कोणाला होऊ नये, याची काळजी घ्यावी.

ते म्हणाले, मला वैयक्तिकपणे असे राजकारण पटत नाही. सध्या महागाईसह अनेक समस्या आहेत. पेट्रोल, डिझेल दरामुळे जनता होरपळून निघत आहे. त्याकडे लक्ष दिले पाहिजे. 145 ची मॅजिक फिगर गाठतो त्याचे सरकार आता होते. सरकार येतात आणि जातातही. येथे सरकार स्थापनेचे ताम्रपट कोणी घेऊन आले नाही. मी माझ्या लहानपणापासून राजकारण बघत आलो आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दलही काहीतरी बोलले जाते. इतक्या खालच्या पातळीवर शरद पवार कधीच बोलले नाहीत. आपण सुसंस्कृतपणा सोडता कामा नये, असे ना. अजित पवार म्हणाले.

Back to top button