अतिवृष्टीच्या इशार्यानंतर महाड मध्ये सतर्कता; एनडीआरएफच्या तुकड्या तैनात
हवामान विभागाने पुन्हा एकदा अतिवृष्टीचा रेड अलर्ट रायगड जिल्ह्याला दिला आहे. या पार्श्वभूमीवर महाड शहरासह तालुक्याला असलेला पूर आणि दरडींचा धोका विचारात घेवून विशेष सावधगिरी बाळगण्यात येत आहे. एनडीआरएफची एक तुकडी तातडीने महाड येथे बोलावून घेण्यात आली आहे. त्याच बरोबर रायगड पोलिसांचे सागरी गस्त पथक देखील तैनात करण्यात आले आहे.
तळीये दुर्घटनेनंतर महाड तालुक्यातील जवळपास ७२ गावांना दरडींचा धोका असल्याचे समोर आले आहे. या सर्व गावांतील धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबाना पुन्हा एकदा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- पुन्हा राणे विरुद्ध शिवसेना; कोकणातील विमान उड्डाणाची तारीख बदलली
- …चक्क ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राच्या स्वरूपात गणेशमूर्ती!
गत महिन्यात तळीये येथे दरड कोसळल्यानंतर एनडीआरएफ नसल्याने मदत आणि बचाव कार्य तत्काळ सुरु करता आले नव्हते. नंतरही प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमुळे बचाव पथकांना तळीये येथे पोहोचण्यास विलंब झाला होता. परिणामी ८७ लोकांना या दुर्घटनेत प्राण गमवावे लागले होते.
दुर्दैवाने तालुक्यात कुठेही या घटनेची पुनरावृत्ती झालीच, तर तक्ताळ पोहोचता यावे यासाठी एनडीआरएफची २२ जणांची तुकडी तर पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास मदत कार्यासाठी सागरी गस्त पथकाच्या पोलिसांची तुकडी हाय अलर्टवर ठेवण्या आली आहे.