तळीये गावातील सर्व ग्रामस्थांना शासनाकडून घरे मिळणार : आ. भरतशेठ गोगावले    | पुढारी

तळीये गावातील सर्व ग्रामस्थांना शासनाकडून घरे मिळणार : आ. भरतशेठ गोगावले   

महाड; पुढारी वृत्तसेवा :  एक वर्षापूर्वी महाड तालुक्यातील तळीये- कोंढाळकर कोंड येथे झालेल्या दरड कोसळण्याच्या घटनेमधील मृत्युमुखी पडलेल्याच्या नातेवाईकांसह गावांतील सर्व ग्रामस्थांना शासनाकडून घरे मिळणार असल्याची माहिती महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी दिली. गोगावले यांनी कोंडाळकर कोंड येथील या दुर्घटनेचा वर्षपूर्तीनिमित्त आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमाप्रसंगी बोलताना दिली. तर रायगडच्या माजी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी या दरडग्रस्तांच्या नातेवाइकांना व अन्य ग्रामस्थांना दिली जाणारी नविन घरांची कामे गतीने करावीत अशी सूचना केली. शोकाकूल वातावरणात तळीये ग्रामस्थांनी या दुर्दैवी दुर्घटनेच्या वर्ष श्राद्धाचा श्रद्धांजली कार्यक्रम विविध मान्यवर लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी व शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

२२ जुलै २०२१ रोजीच्या काळरात्री महाड तालुक्यातील तळीये कोंढाळकर कोंड येथील सत्त्याऐंशी नागरिकांना झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या घटनेत प्राण गमवावे लागले होते. आज या दुर्दैवी घटनेला वर्ष पूर्ण होत असून या वर्षभरात या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांना शासनामार्फत देण्यात आलेल्या कंटेनरमध्ये आपले आयुष्य व्यतीत करावे लागत आहे. शासनाच्या ‘म्हाडा ‘ या उपक्रमाअंतर्गत या गावांतील सर्व ग्रामस्थांना नवीन घरे बांधून देण्याची घोषणा तत्कालीन शासकीय मंत्र्यांकडून करण्यात आली होती. प्रथम दिवाळीपूर्वी त्यानंतर वर्षभरात ही घरे पूर्ण होतील असा आशावाद व्यक्त करण्यात आला होता. मात्र, आज वर्षपूर्तीदिनी यासंबंधित आपत्तीग्रस्तांच्या घरांची कामे प्राथमिक स्थितीमध्ये सुरू झाल्याचे चित्र प्रत्यक्ष भेटीदरम्यान पाहावयास मिळाले.

या दुर्घटनेतील दुर्दैवी नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी आपल्या सहकाऱ्यासोबत भेट देऊन नागरिकांच्या या कार्यक्रमात सहभागी झाले व  या दुर्घटनास्थळी उभारण्यात आलेल्या स्मृतिस्तंभाला पुष्पमाला अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी बोलताना त्यांनी तरीही गावांतील सर्व ग्रामस्थांना शासनामार्फत नव्याने घरे बांधून देण्यात येतील, या तत्कालीन शासनाच्या घोषणेचा पुनरुच्चार केला जाईल. गेल्या काही महिन्यात आलेल्या अडचणी आगामी काळात दूर होतील व लवकरात- लवकर  सर्व ग्रामस्थांना नवीन घरामध्ये राहावयास जाण्याकरता लागणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता करण्याबाबत आपण वचनबद्ध असल्याची त्यांनी याप्रसंगी ग्वाही दिली.

यावेळी रायगडचे माजी पालकमंत्री आदिती तटकरे यांनीदेखील तळीये येथे येऊन या दुर्दैवी घटनेतील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना द्यावयाच्या घरासंदर्भात अधिक गतीने कामे होण्यासाठी आपण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची व्यक्तिशः भेट घेऊन मागणी करणार असल्याचे सांगितले. मागील वर्षभरापासून हे दरडग्रस्त नागरिक नवीन घरांच्या प्रतीक्षेत असून नवीन घरांची निर्मिती अधिक वेगाने करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी प्रतिपादित केले.

या श्रद्धांजलीपर वर्षपूर्तीच्या कार्यक्रमाला महाडचे प्रांताधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड, डीवायएसपी नीलेश तांबे, राजीपचे मुख्याधिकारी डॉ. किरण पाटील, तहसीलदार सुरेश काशिद, नायब तहसिलदार खोपकर यांसह स्थानिक शासकीय अधिकारी व माजी सभापती सपना मालुसरे, राजिप सदस्य मनोज काळीजकर, प्रमोद गोगावले, स्थानिक सरपंच- उपसरपंच आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button