पुणे; पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी व्रत घेतल्याप्रमाणे काम करत आहेत. मात्र, कामाचे कौतुक न करता टीका केली जाते. आरोग्य विभागाने टीकेकडे दुर्लक्ष करून जनतेच्या जास्तीत जास्त सहभागाद्वारे आरोग्य क्षेत्रात राज्याला देशात अग्रणी नेणार असल्याचा विश्वास आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने महाआरोग्य चित्रपट महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. विजेत्यांना डॉ. सावंत यांच्या हस्ते पारितोषिक, स्मृतिचिन्ह तसेच रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर, डॉ. केतन खाडे, डॉ. वैशाली बिर्हाडे, डॉ. तृप्ती शिंदे आदी उपस्थित होते. परीक्षक म्हणून स्मिता वैद्यनाथन, विश्राम ढोले, डॉ. वैजयंती पटवर्धन यांनी काम पाहिले.
डॉ. सावंत म्हणाले, 'गेल्या सहा महिन्यांत सरकारने आरोग्य क्षेत्रात नवनवीन योजना राबविल्या आहेत. 'माता सुरक्षित, तर घर सुरक्षित' या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. जागरूक पालक, सदृढ बालक या नव्याने सुरू झालेल्या योजनेलाही चांगला प्रतिसाद लाभत आहे. राज्यातील सर्व सदृढ आणि निरोगी बनविण्याचा संकल्प आरोग्य विभागाने केला आहे.' डॉ. आगाशे म्हणाले, 'महाआरोग्य फिल्म फेस्टिवलनिमित्त अनेक दिग्दर्शक पुढे येतील. सिनेमाकडे केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून न बघता आरोग्य शिक्षणासाठी त्याचा प्रभावी माध्यम म्हणून वापर करता येतो आणि आरोग्य विभागाने ते दाखवून दिले आहे.'