बेल्हे; पुढारी वृत्तसेवा : गेल्या सहा महिन्यांपासून बेल्हेनगरीत वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या बनली आहे. विशेषत: बेल्हे- जेजुरी महामार्गावर असणारी वाहतूक कोंडीची समस्या ही जणू काही पाचवीलाच पूजली आहे. बेल्हे- जेजुरी महामार्गावर फक्त दिवसाच नाही तर रात्रीदेखील प्रचंड वाहतूक कोंडी असते. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणार्या प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. या वाहतूक कोंडीला रस्त्यावरील खड्डे हे प्रमुख कारण आहे.
बेल्हेनगरीत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे बेल्हे- जेजुरी महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. विशेष म्हणजे आज तर या वाहतूक कोंडीची हद्दच झाली. कारण बेल्हे-जेजुरी महामार्गावर बसस्थानक ते मशीद चौकदरम्यान तब्बल चार ते पाच तास गाड्या अडकून राहिल्या. त्यामुळे वाहनचालकांपासून प्रवाशी प्रचंड वैतागले. या वाहतूक कोंडीच्या समस्येवर प्रशासन, सरकार काही उपाययोजना करतील की नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उभा केला जातोय.
जुन्नर तालुक्यातील बेल्हे-जेजुरी महामार्गावर बेल्हेनगरीतील खड्ड्यांमुळे बसस्थानक ते मशीद चौक या दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. अनेक नागरिक शनिवार, रविवार दोन दिवसांची सुटी सेलिब्रेट करण्यासाठी बाहेर फिरायला जातात. पण या नागरिकांना चार-चार तास वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडावे लागत असल्यामुळे त्यांचा प्रचंड हिरमोड झाल्याचे चित्र आहे.
शनिवारी प्रचंड जाम
बेल्हे बसस्थानक ते बँक ऑफ इंडियापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी आहे. गेल्या चार ते पाच तासांपासून या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी आहे. खड्ड्यांमुळे ही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे जेथे वाहतुकीची कोंडी होते तेथे बेल्हे ग्रामपंचायत कार्यालय आहे. ग्रामपंचायत कार्यालयासमोर नेहमी वाहतूक कोंडी निर्माण होते. सरपंच गोट्याभाऊ वाघ यांनी मुरूम टाकून खड्डे बुजवण्याचे अनेक वेळा प्रयत्न केले. पण परिस्थिती जैसे थे आहे.