फुरसुंगी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : फुरसुंगी व उरुळी देवाची हद्दीत असलेला कचरा डेपो महापालिका हद्दीत ठेवून राज्य सरकारने ही गावे महापालिकेतून वगळली आहेत. मात्र, या गावांतील कचरा डेपो नव्याने होत असलेल्या नगरपरिषदेच्या हद्दीत हवा; अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा फुरसुंगी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
कचरा डेपो येथे महापालिका हद्दीत ठेवून सरकारने सोयीस्करपणे महापालिकेतून फुरसुंगी व उरुळी देवाची ही दोन गावे वगळली आहेत. या गावांची नगरपरिषद करण्याचा निर्णय स्तुत्य असला, तरी आमच्या हद्दीतील कचरा डेपो नवीन होऊ घातलेल्या नगरपरिषदमध्येच असावा व या संदर्भातील कचरा डेपोचा सर्व्हे नंबर महापालिकेतून वगळण्यात यावा, अशी मागणी विशाल हरपळे, निलेश पवार, गणेश कामठे, कपिल भाडळे यांनी सरकारकडे केली आहे.
कचरा डेपो महापालिका हद्दीत ठेवण्याचा निर्णय कायम राहणार असेल, तर त्या बदल्यात आम्हाला पिण्याच्या पाण्याचे टँकर कायमस्वरूपी देणे, नवीन नगरपरिषदेसाठी दरवर्षी 25 कोटी निधी देणे, ठेकेदारी पध्दतीवर महापालिकेत रूजू केलेल्या फुरसुंगी व उरूळी देवाची येथील कर्मचार्यांना नोकरीत कायम करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत राज्य सरकार व महापालिकेने सकारात्मक विचार करावा; अन्यथा आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विशाल हरपळे यांनी प्रशासनाला दिला आहे.
राज्य सरकारने कचरा डेपो महापालिका हद्दीतच ठेवून फुरसुंगी व उरुळी देवाची ही गावे महापालिकेतून वगळली आहेत. मात्र, या दोन गावांची नव्याने स्वतंत्र नगरपरिषद होईल, तेव्हा या नगरपरिषदेचा कचरा कुठे जिरवायचा? पुणे महापालिका याठिकाणी या नगरपरिषदेला कचरा टाकू देईल का? असा प्रश्न भविष्यात उद्भवण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.