घाटमाथ्यावर संततधार; चारही धरणांतून विसर्ग

खडकवासला साखळीत 99.22 टक्के पाणीसाठा
khadakwasla
खडकवासलाPudhari
Published on
Updated on

सिंहगड, खडकवासला भागात गुरुवार (दि. 26) सकाळपासून पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र, रायगड जिल्ह्याच्या हद्दीतील पानशेत, वरसगावच्या घाटमाथ्यावर दुपारपासून संततधार सुरू असल्यामुळे खडकवासला साखळीतील चारही धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणसाखळीत सायंकाळी पाच वाजता 28.92 टीएमसी (99.22 टक्के) इतका पाणीसाठा होता. बुधवारी (दि. 25) रात्री खडकवासलातून 15 हजार क्युसेकपेक्षा अधिक पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. पावसाचा जोर ओसरल्याने विसर्ग टप्प्या-टप्प्याने कमी करण्यात आला. सध्या खडकवासलातून 4 हजार 708 क्युसेक पाणी नदीत सोडले जात आहे. पानशेतमधून 2 हजार 226, वरसगावमधून 1 हजार 794 आणि टेमघरमधून 275 क्युसेक पाणी सोडले जात आहे.

बुधवारी सकाळी सहा ते गुरुवारी सकाळी सहा वाजेपर्यंतच्या 24 तासांत पानशेत येथे सर्वात अधिक 68, तर याच कालावधीत वरसगाव येथे 57, टेमघर येथे 43 व खडकवासला येथे 40 मिलिमीटर पाऊस पडला. वरसगाव धरण प्रकल्पाचे शाखा अभियंता वीरेश राऊत म्हणाले की, गेल्या पाच दिवसांपासून धरण क्षेत्रात पाऊस सक्रिय आहे. पाण्याची आवक वाढल्याने धरणांतील जादा पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

सर्व धरणे भरून वाहत असल्याने खबरदारीसाठी नदीकाठच्या रहिवाशांना सावधानतेचे आवाहन केले आहे. पावसाचा जोर आणखी वाढल्यास जादा पाणी सोडण्यात येणार आहे.

मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग

धरणांवर जागता पहारा

पाण्याची आवक वाढल्याने खडकवासल्याच्या विसर्गात बुधवारी रात्री दहा वाजता वाढ करण्यात आली. जोरदार पाऊस पडल्यास नदीकाठच्या भागात 24 जुलैसारखी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने अधिकार्‍यांसह नदीकाठच्या रहिवाशांची झोप उडाली. रात्रभर सर्व धरणांसह पूरस्थिती निर्माण होणार्‍या भागात अधिकारी, कर्मचारी जागता पहारा देत होते. अखेर मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर ओसरला आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास घेतला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news