MP Sambhajiraje : मराठा आरक्षणासाठी आता पुणे ते मुंबई लाँग मार्च | पुढारी

MP Sambhajiraje : मराठा आरक्षणासाठी आता पुणे ते मुंबई लाँग मार्च

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा

मराठा आरक्षणाचा मुद्दा तातडीने सुटेल असे वाटत नाही. त्याला पर्याय म्हणून मराठा समाजाला पाच मुलभूत सुविधा देण्याबाबत राज्य शासनाने अद्याप काहीच पावले उचललेली नाहीत. त्यासाठी पुन्हा आम्ही वेळ देत आहोत. सरकारने या प्रश्‍नी निर्णय घेतला नाही तर पुणे ते मुंबई लॉर्ग मार्च काढावा लागेल, असा इशारा खासदार छत्रपती संभाजीराजे (MP Sambhajiraje) यांनी आज (दि.23) दिला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्रमासाठी आले असता ते बोलत होते.

या वेळी खासदार संभाजीराजे म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाची जबाबदारी आम्ही स्पष्ट केली आहे. आरक्षणाचा मुद्दा लगेच सुटेल असे नाही. सहा महिने किंवा वर्ष लागले. तोपर्यंत राज्य शासनाने सामाजिक मागासगर्वीय आयोग किंवा समिती नियुक्त करावी. सर्वेक्षण करावे. मराठा समाज आता सामाजिक मागास राहिलेला नाही. प्रथम ते सिद्ध करावे लागणार आहे. त्यासाठी सर्वेक्षण होणे महत्वाचे आहे. काहीच न झाल्यास शेवटचा पर्याय केंद्राचा आहे. (MP Sambhajiraje)

राज्य शासनाने पाच मुलभूत सुविधा देण्याबाबत तातडीने पावले उचलणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे. राज्य शासनाने काही न केल्यास लाँग मार्चशिवाय पर्याय नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, औरंगाबाद शहराला संभाजीनगर नाव देण्यास हरकत नाही, असेही ते म्‍हणाले.

शासनाने एसटी संपावर तोडगा काढावा

सरकारला विनंती आहे. बाकीचे कामे बाजूला राहतील, ते ती ठेवा. मुख्यमंत्र्यांनी एसटी कर्मचार्‍यांच्या शिष्टमंडळाला ताबडतोब बोलावून घेत तोडगा काढून त्यांना दिलासा द्यावा. किती दिवस ते आझाद मैदानावर बसणार, सर्वसामान्यांची गैरसोय किती दिवस होणार, हे तत्काळ थांबवा, अशी मागणीही संभाजीराजेंनी यावेळी केली. (MP Sambhajiraje)

हेही वाचलं का?

Back to top button