पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे श्वसनासह खोकला व इतर आजार होत आहे. त्यामुळे शहरातील वाढते वायुप्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी तक्रारी सोमवारी (दि.20) झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी केल्या.
महापालिकेच्या सर्व 8 क्षेत्रीय कार्यालयांत सोमवारी जनसंवाद सभा झाली. त्यात 58 नागरिकांनी सहभाग घेतला. वाहनांमुळे तसेच, बांधकाम, खोदकाम, खाणकाम, कचरा जाळणे आदींमुळे वायुप्रदूषण वाढत आहे. हिवाळ्यामुळे दूषित हवा वर जात नसल्याने प्रदूषणात भर पडत आहे. प्रदूषण वाढल्याने नागरिकांना श्वसनाचे आजार होत आहेत. तसेच, खोकला, कफ व इतर आजारांचे रुग्ण वाढत आहेत. विशेषत: वयोवृद्ध व लहान मुलांना आजार होण्याची प्रमाण अधिक आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने उपाययोजना कराव्यात, अशी तक्रार नागरिकांनी केली.
तसेच, शहरातील वाढत्या रहदारीमुळे सर्वच चौकांत वाहतूक कोंडी होत आहे. तर, काही रस्त्यांवर वाहतूक संथ होते. भटक्या व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. उघड्यावर कचरा टाकणार्यांवर दंडात्मक कारवाई करावी. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम वेगाने करावे. शहर परिसरात वेळोवेळी किटक फवारणी करण्यात यावी, अशा तक्रारीही नागरिकांनी केल्या. सभेच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, सहशहर अभियंता मनोज सेठीया, संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, उपायुक्त अजय चारठाणकर, सहायक आयुक्त विजयकुमार सरनाईक हे होते. या वेळी क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, अण्णा बोदडे, किरण मोरे, राजेश आगळे, सीताराम बहुरे, उमेश ढाकणे व अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा