बेल्हे : एसटीतील प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात; दुरुस्तीकडे एसटी परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष | पुढारी

बेल्हे : एसटीतील प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात; दुरुस्तीकडे एसटी परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष

बेल्हे; पुढारी वृत्तसेवा: सुरक्षित प्रवासाची हमी देणारी एसटीच आता प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. एसटी बसचे टायर गुळगुळीत झाले असून, काही गाड्यांच्या खिडक्यांना काचा नसल्याने प्रवाशांची सुरक्षितताच धोक्यात आली आहे. गाड्यांच्या दुरुस्तीकडे एसटी महामंडळाने दुर्लक्ष केले आहे. काही गावांत रस्ता चांगला नसतानाही केवळ प्रवाशांची गैरसोय नको म्हणून तेथे सेवा दिली जात आहे. मात्र, ज्या बसगाड्यांद्वारे प्रवाशांना सेवा दिली जाते त्या बसगाड्यांची अवस्था अत्यंत खराब आहे.

बसच्या खिडक्यांच्या काचा तुटल्या आहेत. काही गाड्यांना इंडिकेटर नाहीत. नवीन टायर उपलब्ध होत नसल्याने गाड्यांना गुळगुळीत झालेले टायर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे पंक्चरचे प्रमाण वाढले आहे. तसेच अपघाताची शक्यता वाढली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब गंभीर असतानाही महामंडळाने याकडे दुर्लक्षच केले आहे. जुन्नर तालुक्यातील अनेक रस्ते खराब झाले आहेत. त्यातच एसटीच्या आयुष्यमान संपत चाललेल्या गाड्या वापरल्या जात आहेत.

खराब गाड्यांतून प्रवास करणे प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. मिनी बसही आता अखेरच्या घटका मोजत आहे. या छोट्या बस सातत्याने नादुरुस्त होत असून रस्त्यात मध्येच बंद पडतात, अशी प्रवाशांची तक्रार आहे. नव्या बसगाड्या नसल्यामुळे नाईलाजास्तव एसटी महामंडळाला जुन्या झालेल्या बसगाड्यांद्वारे सेवा द्यावी लागत आहे.

जुन्या झालेल्या व आयुष्यमान संपत चाललेल्या गाड्या स्क्रॅपमध्ये काढल्या जातात. महामंडळाकडून दरवर्षी स्क्रॅप धोरण निश्चित करून विभागांना कळवले जाते. या वर्षात मात्र असे धोरणच कळवलेले नाही. त्यामुळे कोणत्या गाड्या भंगारात काढायच्या याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे, असे नारायणगाव एसटी आगारातील वर्कशॉप कर्मचार्‍यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

 

Back to top button