‘रिक्षा चालक-मालकांसाठी कल्याणकारी मंडळाबाबत राज्य सरकार सकारात्मक’ | पुढारी

‘रिक्षा चालक-मालकांसाठी कल्याणकारी मंडळाबाबत राज्य सरकार सकारात्मक’

पिंपरी :  रिक्षा चालक-मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे, अशी माहिती महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली. कांबळे यांनी शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. या वेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती कांबळे यांनी नुकतीच प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात पुढे म्हटले की, या भेटीदरम्यान विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्या. या मध्ये रिक्षा चालक-मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करणे, भविष्यासाठी उदरनिर्वाह, म्हातारपणी पेन्शन, अपघाती विमा अशा विविध प्रकारच्या सुविधा त्यामध्ये असाव्यात, या मागण्या गेल्या 30 वर्षांपासून रिक्षा चालक-मालकांनी लावून धरल्या आहेत. कल्याणकारी मंडळा संदर्भात अनेक मेळावे, आंदोलने देखील करण्यात आले आहेत.

कल्याणकारी मंडळ हे तामिळनाडू धर्तीवर असावे किंवा महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र असावे, या संदर्भात सरकारने घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयाबाबत भूमिकेला पाठिंबा देण्यासंदर्भात रिक्षा संघटनामध्ये फूट पडली होती. विद्यमान शिंदे सरकारने रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ निर्माण करण्याची घोषणा केल्याने रिक्षा चालक व मालक यांना दिलासा मिळाला आहे. असे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

Back to top button