धोकादायक घरे शोधून नागरिकांचे स्थलांतर करा; जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायतींना आदेश | पुढारी

धोकादायक घरे शोधून नागरिकांचे स्थलांतर करा; जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायतींना आदेश

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पावसामुळे जिल्ह्यात पडझडीच्या दुर्घटना घडत असल्याने जिल्हा परिषदेने तत्काळ धोकादायक इमारती, घरांचा शोध घेण्याचे आदेश ग्रामपंचायतींना दिले आहेत. त्यांचा शोध घेऊन तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यास सांगण्यात आले आहे. जुन्नर, आंबेगाव, मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने पावसामुळे पडझड, दरड कोसळण्याच्या घटना अधिक घडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने या तालुक्यांतील गावांवर लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामसेवक, तलाठी, तसेच ग्रामपंचायतीच्या कर्मचार्‍यांना याबाबत सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. जिल्ह्यात अनेक भागांत पाऊस सुरू आहे. काही भागांत दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अनेक भागांतील रस्ते बंद आहेत. रस्त्यातील अडथळे दूर करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी घेतलेल्या बैठकीत ग्रामपंचायतींना धोकादायक इमारती, घरांचा शोध घेण्याच्या सूचना देण्याचे निर्देश दिले होते; तसेच धोकादायक घर आढळल्यास संबंधित कुटुंबीयांना स्थलांतरित करण्यासाठी जिल्हा परिषदेला निधी मिळणार आहे.

                                  -आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

Back to top button