
राजगुरुनगर, पुढारी वृत्तसेवा: शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुढील लोकसभा निवडणूक पुणे मतदारसंघातून लढवावी असे आदेश पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांकडून देण्यात आले आहेत. पक्षाच्या या निर्णयामुळे शिरूर मतदार संघातील सेनेचे कार्यकर्ते व आढळराव पाटील समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. एकंदरीत शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचा डाव तर रचल्या जात नाही ना असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
सलग तीन वेळा खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेने नुकतीच हकालपट्टी केली व काही वेळात ती मागे घेतली. या पार्श्वभूमीवर आढळराव पाटील यांनी मंगळवारी ५ जुलै रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत आदी उपस्थित होते. यावेळी अडीच वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटील यांनी शिरूरऐवजी पुणे लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी असे संजय राऊत यांनी सर्वांच्या उपस्थितीत सुचवले. त्याचे पडसाद शिरूर मतदारसंघातील सेना कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहेत.
महाविकास आघाडीत अडकुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेमात पडल्यावर शिवसेनेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळाले आणि तेवढाच गाजावाजा होऊन ते गेले. पक्षाचे ४० आमदार बाहेर पडले. महानगरपालिका, नगरपालिकेतील नगरसेवक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील होत आहेत. राज्यात सेनेचे राजकीय खच्चीकरण सुरू आहे. असे असताना शिवसेनेचे प्रवक्ते, राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ग्रामीण-शहरी भाग असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीला सेफ करण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याचे चित्र उभे राहिले आहे. पक्षाचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील समर्थकांनी यावर नाराजी व्यक्त करीत तीव्र आक्षेप घेतला आहे.
महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार अडीच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून ही जागा राष्ट्रवादीकडे राहु शकते. डॉ. कोल्हे यांचा निवडणुकीनंतर मतदारसंघात जनसंपर्क नसल्याचा आरोप आहे. त्याउलट नियमित संपर्कात असल्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुन्हा जनाधार वाढु लागल्याचे गावोगावचे चित्र व चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. कोल्हे यांच्याऐवजी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना शिरूरमधुन उमेदवारी देऊन निवडुन आणण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे मानले जात आहे. असे झाल्यास आढळराव पाटील यांना पक्षात ठेऊन इतर ठिकाणी लढवायचे किंवा त्यांनी स्वतःहून पक्ष बदलावा, असे समीकरण सेनेकडून उदयाला आणले जात असल्याचे कार्यकर्ते बोलत आहेत.
पक्षाने आदेश दिल्यास आपण पुण्यातुन निवडणूक लढवू; मात्र आपल्यावर प्रेम करणाऱ्या हक्काच्या म्हणजेच शिरूर लोकसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढविण्यासाठी प्रबळ इच्छुक आहे.
– शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार, शिरूर