हिंजवडी आयटीतील वाहतूक सुस्तावली | पुढारी

हिंजवडी आयटीतील वाहतूक सुस्तावली

हिंजवडी : मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या हलक्या स्वरूपाच्या पावसामुळे आयटीनगरी हिंजवडीची वाहतूक सुस्तावली आहे. यातच मुख्य रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्यामुळेदेखील वाहतूक संथ गतीने सुरू होती. यामुळे आयटीयन्स व वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला.

गुरुवारी सकाळपासूनच पाऊस सुरू होता. शुक्रवारीदेखील संध्याकाळपर्यंत पाऊस काही प्रमाणात होत असल्याने शेतकर्‍यांना मात्र दिलासा मिळाला आहे. सलग दोन दिवस पावसाची हजेरी असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच, विजेचा लपंडावदेखील होत असल्याने अनेकदा वीज खंडित होत होती.

अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी पोचले होते. तर, पावसामुळे दुचाकी वाहनेदेखील रस्त्यावर घसरत होती. शेतकर्‍यांना या पावसाने दिलासा दिला आहे. खरीप हंगामाच्या पेरण्या आता पूर्ण होत असून, भातरोपेदेखील वाढीस आली आहेत. तर, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनेक रस्ते, ड्रेनेजची कामे अपूर्ण असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.

Back to top button