मंत्रिमंडळात शिवतारेंची वर्णी लागणार ; राजकीय वर्तुळात चर्चां
नारायणपूर : पुढारी वृत्तसेवा: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नवीन मंत्रिमंडळात पुरंदर- हवेलीचे माजी आमदार विजय शिवतारे यांची वर्णी लागणार का, याबाबत पुरंदर, हवेलीसह पुणे जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे. विजय शिवतारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात केलेल्या चमकदार कामगिरीमुळे त्यांच्या नावाची चर्चा होऊ शकते, असा मतप्रवाह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. विजय शिवतारे हे बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर हवेलीतून यापूर्वी दोन वेळा निवडून आले आहेत.
लोकसभा निवडणुकीत शिवतारे यांनी पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आघाडी उघडून आक्रमक प्रचार केला होता. त्यात
सुप्रिया सुळे निवडून आल्या, मात्र पार्थ पवार यांचा दारुण पराभव झाला होता. त्याचे उट्टे काढत अजित पवारांनी मागील निवडणुकीत शिवतारे यांच्या विरोधात मोठी ‘फिल्डिंग’ लावून त्यांना पराभूत केले. शिवतारे यांचा जलसंपदा, कृषी आणि ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ उभारणीच्या बाबतीत असलेला गाढा अभ्यास याचा विचार होऊ शकतो, असा कयास आहे.
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शिवतारे यांचे सहकार्य सरकारला लाभल्यास हा प्रकल्प मार्गी लागू शकतो. याशिवाय शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून त्यांनी यापूर्वी प्रभावीपणे काम केलेले आहे. विधिमंडळातील त्यांची कामगिरी लक्षणीय राहिली आहे. महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यात शिवतारे यांचा हातखंडा मानला जातो. गुंजवणी धरण त्यांनी ज्या वेगाने पूर्ण केले, त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळात त्यांचा एक आगळावेगळा दबदबा निर्माण झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील 40 वर्षे रखडलेली आष्टी आणि नगर जिल्ह्यातील निळवंडे प्रकल्प त्यांनी ज्या पद्धतीने मार्गी लावला त्याने खुद्द आदित्य ठाकरेही प्रभावित झाले होते. शिवतारे यांचे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या सलोख्याच्या संबंधांमुळे त्यांना मंत्री पदाची ’लॉटरी’ लागू शकते, असेही म्हटले जाते. 2019 मध्ये शिवतारे यांचा पराभव झाल्यानंतर पुरंदर हवेलीच्या विकासाला ग्रहण लागल्याचे बोलले जाते. शिवतारे यांना या सरकारमध्ये संधी मिळाल्यास पुरंदर-हवेलीच्या विकासाला चालना मिळेल