आषाढी वारीसाठी शिरूर आगारातून जादा बस
शिरूर : पुढारी वृत्तसेवा: आषाढी वारीठी शिरूर एसटी आगारातून शिरूर तालुका व शहरातील भाविकांसाठी जादा एसटी बस सोडण्याचे नियोजन केले आहे. पंढरपूरसाठी 40 भाविकांनी एकत्रित बुकिंग केल्यास संबंधिताच्या थेट गावातून एसटी सोडणार असल्याचे शिरूरचे आगार व्यवस्थापक महेंद्र माघाडे यांनी सांगितले. यंदा कोरोनाचे निर्बंध हटविल्यानंतर यात्रा मोठ्या स्वरूपात भरेल, असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर यात्रेच्या नियोजनासाठी एसटी प्रशासनाने जास्तीत जास्त प्रवाशांनी एसटीने प्रवास करावा या उद्देशाने ज्या गावांमधून मागणी असेल आणि किमान 40 प्रवासी उपलब्ध असतील, तेथून समूहासाठी थेट एसटी बस सोडण्याचे नियोजन केले आहे.
तसेच या ग्रुपसाठी पुन्हा परतीच्या प्रवासासाठी पंढरपूर येथूनही बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. बससाठी नियमित प्रवासी भाडेच प्रवाशांकडून घेतले जाणार आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, प्रवासी पास आदी सवलतीही असणार असल्याचे माघाडे यांनी सांगितले. ग्रुप बुकिंगसाठी आगार व्यवस्थापक महेंद्र माघाडे (मो.क्र. 9561611999) यांच्याशी संपर्क साधावा.