‘खडकवासला’त फक्त 2.72 टीएमसी पाणीसाठा; पाऊस न झाल्यास पाणीकपात अटळ | पुढारी

‘खडकवासला’त फक्त 2.72 टीएमसी पाणीसाठा; पाऊस न झाल्यास पाणीकपात अटळ

पुणे : पुढारी वृत्तसेवा: जलसंपदा विभागाने शहराला 15 जुलैपर्यंत पाणी पुरेल असे नियोजन केले असले, तरी पाणलोट क्षेत्रात पावसाने ओढ दिल्यामुळे धरणांतील पाण्याने तळ गाठला आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला धरणसाखळीत केवळ नऊ टक्के म्हणजेच 2. 72 टीएमसी पाणीसाठा उरला आहे. पाऊस न झाल्यास पाणीकपात अटळ आहे. टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. पाऊस वेळेत सक्रिय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. त्यानुसार जलसंपदा विभागाने सिंचनासाठी देण्यात येणार्‍या उन्हाळी आवर्तनाचा एक टप्पा वाढविला.

त्यामुळे गेल्या आठ दिवसांत पाणीसाठा कमी झाला. याशिवाय, कडक उन्हाळ्यामुळे वाढती पाण्याची मागणी, पाणीचोरी व गळती, अशा विविध कारणांमुळेही धरणांमधील पाणीसाठा कमी झाला आहे. टेमघर धरण यापूर्वीच दुरुस्तीसाठी रिकामे करण्यात आले आहे. या धरणामधील पाणीसाठा खडकवासला धरणात सोडून देण्यात आला आहे. त्यामुळे या धरणात सध्या शून्य टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी 27 जूनपर्यंत खडकवासला धरणसाखळीमध्ये 8.42 टीएमसी म्हणजेच 28.90 टक्के पाणीसाठा झाला होता. यंदा 2.72 टीएमसी म्हणजेच 9.34 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 5.70 टीएमसीने पाणीसाठा कमी आहे, असे जलसंपदाकडून सांगण्यात आले. दरम्यान, यंदा मान्सून सक्रिया झाल्यानंतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तुरळक पाऊस हजेरी लावत आहे. जून महिना संपत आला, तरी दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली नाही, तर पुणेकरांना पाणीकपातीच्या संकटाला नक्की सामोरे जावे लागेल. त्याशिवाय गत्यंतर नसल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.

धरणसाखळीतील पाणीसाठा
धरण पाणीसाठा (टीएमसी) टक्के
टेमघर 0 0
वरसगाव 1.23 9.58
पानशेत 1.21 11.35
खडकवासला 0.29 14.47
एकूण 2.72 –

Back to top button