समाजाच्या पाठबळावरच मराठी भाषेसाठी प्रयत्न; डॉ. अशोक कामत यांचे मत
पुणे, पुढारी वृत्तसेवा: ‘मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, ग्रंथालयांचा विकास आणि पुस्तक प्रकाशन व्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी समाजाच्या पाठबळावरच आपण प्रयत्नशील राहू या,’ असे मत संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. अशोक कामत यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था आणि गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित साहित्यविषयक चर्चेत डॉ. कामत बोलत होते. मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, डॉ. अविनाश चाफेकर, अश्विनी धोंगडे, श्याम भुर्के, कविता भालेराव, रमण चितळे उपस्थित होते. मराठी भाषा, साहित्य व्यवहार, वाचनालये, वाचन संस्कृती, तंत्रज्ञान, ग्रंथ समीक्षा अशा विविधांगाने चर्चा झाली. प्रा. अविनाश सांगोलेकर, डॉ. सागर देशपांडे, राजीव बर्वे, सुबोध कुलकर्णी आणि प्रा. डॉ. वर्षा तोडमल आदींनी विचार मांडले.
डॉ. कामत म्हणाले, ‘एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून आपण मागणी करीत असताना दुसरीकडे पुण्या-मुंबईसह अनेक ठिकाणी मराठी माध्यमातील शाळा बंद होत आहेत. सरकार त्याबाबतीत काही करत नाही. भाषा, संस्कृतीविषयक उपक्रम शासनाची कोणत्याही प्रकारची मदत न घेता निश्चितपणे यशस्वी होऊ शकतात. अधिक समृद्ध करता येतात.’ प्रा. रवींद्र कोठावदे यांनी सूत्रसंचालन केले. शुभदा वर्तक यांनी आभार मानले.
हेही वाचा
रसिकांना सक्षम करण्याचे काम संगीतकाराने करावे; सत्यशील देशपांडे यांचे मत
नगर : श्रीरामपूर पालिकेत दिग्गजांचे गड शाबुत; काहींचे खालसा..!
छत्रपती शिवाजी महाराज आदर्श क्रांतिकारक; कीर्तनकार मोरेश्वर जोशी-चर्होलीकर यांचे प्रतिपादन