अकोला, वर्धा, चंद्रपूरचे तापमान 44.8 अंशांवर | पुढारी

अकोला, वर्धा, चंद्रपूरचे तापमान 44.8 अंशांवर

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा कहर सुरू असून सोमवारी विदर्भातील वर्धा, चंद्रपूर आणि अकोला या शहरांचे तापमान 44.8 अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले आहे. या हंगामातील तापमानाची ही सर्वोच्च नोंद आहे.

राज्याच्या सर्वच भागांत सरासरी कमाल तापमानात 2 ते 4 अंशांपर्यंत वाढ झाली आहे. उष्णतेचा कहर वाढत असतानाच 21 ते 23 एप्रिल या काळात मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांत विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, हरियाणा, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये उष्णता वाढली आहे. या भागात कमाल तापमान 44 अंशांच्या पुढे नोंदले गेले आहे. काही भागांत तर सरासरी तापमानात 2 ते 4 अंशांपर्यंत वाढ झाली आहे. या भागाकडून राज्याकडे उष्ण वारे वाहत आहेत.

बंगाल उपसागरापासून ते उत्तर तामिळनाडू आणि पुढे दक्षिण-पश्चिम गुजरातपर्यंत चक्रीय स्थिती आहे. याचबरोबर अरबी समुद्राच्या भागातदेखील चक्रीय स्थिती वाढली आहे. या दोन्हीच्या परिणामामुळे 21 आणि 22 एप्रिल रोजी राज्याच्या सर्वच भागांत अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे.

Back to top button