वाडा : वाडा भिवंडी या महामार्गाची दुर्दशा झाल्याने हलक्या वाहनांसह अवजड वाहनेही कांचारा - वासिंद या मार्गावरून रेटली जात आहेत. कुणाचेही लक्ष नसल्याने अनेक ठिकाणी हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला असून रोज या ठिकाणी अपघात घडत आहेत. रविवारी रात्री एक हायवा ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन पलटला असून यात चालक गंभीर जखमी झाला आहे.
कांबारा पिवळी वासिंद हा मार्ग नाशिक महामार्गाला जोडणारा जवळचा मार्ग असल्याने वाडा भिवंडी महामार्गाला तो उत्तम पर्याय आहे. नुकताच या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आले असतानाच वाडा -भिवंडी महामार्गाची दुर्दशा झाल्याने बहुतांश वाहने याच मागनि वळवली जातात. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष असल्याने अवजड वाहने देखील काहीशा अरुंद असलेल्या याच मार्गावरून वळवली जात आहेत. जंगलातून जाणारा हा मार्ग आधीच अरुंद असल्याने खचलेल्या रस्त्याच्या कडा रोज अपघाताला आमंत्रण देत आहेत.
रविवारी रात्री खैरे येथून गोरेगावच्या दिशेने गौण खनिज घेऊन जाणारा एक हायवा ट्रक अंदाज न आल्याने रस्त्याच्या कडेला पलटला, प्रवाशांनी मोठ्या शिताफीने यातील चालकाला बाहेर काढून त्याला दवाखान्यापर्यंत पोहोचवल्याने शैलेंद्र यादव या चालकाचा जीव बचावला, स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा मार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा बनला असून जीव मुठीत घेऊन आम्हाला प्रवास करावा लागती. सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच वन विभागाने या रस्त्यावरून येजा करणाऱ्या अवजड वाहनांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे