देवळा : गेल्या तीन ते चार दिवसांपासून तालुक्यात पावसाची संततधार सुरूच असून सप्टेंबर महिन्यात ८४.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात बुधवारी (दि.२५) रात्री आठच्या सुमारास वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामध्ये शेकडो एकर क्षेत्रावरील मका भुईसपाट झाला असून तूर, सोयाबीनबरोबर महागडे कांदा बियाणे वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
तालुक्यात तीन ते चार दिवसांपासून परतीच्या पावसाने चांगलाच जोर धरला असून काढणीला आलेल्या शेती पिकांचे नुकसान झाले आहे. संततधार पावसामुळे नदी-नाले दुथडी वाहू लागल्याने पूर्व भागातील पाणी टंचाई दूर झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. बुधवारी रात्री वादळी-वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने शेतात उभा असलेला मका भुईसपाट झाला. अनेक झाडे उन्मळून पडली. शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. तालुक्यातील पश्चिम भागात पावसामुळे कोलथी नदीचा प्रवाह वाढला असून हे पाणी थेट किशोर सागर (रामेश्वर धरणात ) मध्ये गेल्याने सांडव्याच्या पाण्यात वाढ झाली आहे.
दुसरीकडे या पावसामुळे महागडी कांद्याचे बियाणे वाया जाणार असल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे .
देवळा मंडळ- (दि. २४) ४.० मिमी, (दि.२५) ३.८ मिमी, (दि.२६) २८.३ मिमी.
लोहोणेर मंडळ- (दि.२४) ११.८ मिमी, (दि.२५) २.५ मिमी, (दि.२६) ३३.० मिमी.
उमराणे मंडळ - (दि.२४) ४४.३ मिमी, (दि.२५) १६.३ मिमी, (दि.२६) २४.८ मिमी.
खर्डे मंडळ - (दि.२४) ३५.५ मिमी, (दि.२५) ४.५ मिमी, (दि.२६) ४८.३ मिमी.