सटाणा(जि. नाशिक) : केंद्रातील सरकारला सत्तेतून खेचायचे असेल तर आधी महाराष्ट्रातील सरकार खाली खेचावे लागेल. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जनतेने परिवर्तनाचा निर्धार केला आहे. लोकसभेत ज्या पद्धतीने नाशिक, दिंडोरीत महाविकास आघाडीची पाठराखण केली, त्याच पद्धतीने विधानसभा निवडणुकीतही आशीर्वाद द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
सोमवारी (दि.२३) शिवस्वराज्य यात्रेत ते बोलत होते. खा. डॉ. अमोल कोल्हे, खा. भास्कर भगरे, खा. डॉ. शोभा बच्छाव, युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे, गजानन शेलार, माजी आ. दीपिका चव्हाण, माजी आ. संजय चव्हाण, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, केशव मांडवडे, मनोज सोनवणे, साहेबराव सोनवणे, विजय वाघ आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, राज्यातील सरकार थकबाकीदार बनले आहे. विकासकामे ठप्प झाले असून, केवळ प्रसिद्धी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. खा. डॉ. कोल्हे यांनी राज्यातील शेतकरी, महिला, बेरोजगार, युवक, आदिवासी आणि सर्वसामान्य जनता राज्य शासनाच्या कारभाराला वैतागली असल्याचे म्हटले. माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी मौनी आमदाराची परंपरा आपण मोडल्याचा अभिमान असल्याचे सांगत बागलाणवासीयांची अविरत सेवा करणार असल्याची ग्वाही दिली.
सभेच्या प्रारंभी नाशिक येथील वसतिगृहात आत्महत्या केलेल्या अस्मिता पाटील या विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी सभास्थळी बॅनर झळकवित न्यायाची मागणी केली. यावेळी जयंत पाटील व खा. कोल्हे यांनी कुटुंबीयांशी चर्चा करत पोलिस अधीक्षकांशी चर्चा करून न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली.
कुठल्याही नैसर्गिक आपत्ती अथवा बाजारभाव घसरल्यास शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळाला किंवा आर्थिक नुकसान झाले तर कुठल्याही आंदोलनाची किंवा अधिवेशनाची वाट न पाहता बाधित शेतकऱ्यांना आधारभूत किमतीनुसार भरपाई देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचे आश्वासन यावेळी पाटील यांनी शेतकऱ्यांना दिले.