धोक्याची कोणतीही अपेक्षा नव्हती, तांबे पिता-पुत्राला नाना पटोलेंचे खडेबोल | पुढारी

धोक्याची कोणतीही अपेक्षा नव्हती, तांबे पिता-पुत्राला नाना पटोलेंचे खडेबोल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पदवीधर मतदार निवडणुकीसाठी मी पक्षाचे दोन कोरे एबी फाॅर्म पाठवले होते. धोक्याची कोणतीही अपेक्षा नव्हती. मात्र, तांबे पिता-पुत्रांच्या कौटुंबिक विषयामुळे त्यांनी पक्षाचा अर्ज भरला नाही. त्यामुळे आमच्यासाठी तो विषय संपला असून, आता आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करीत असल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी सांगितले. कॉंग्रेस कमिटीत आयोजित कार्यक्रमानंतर आ. पटोले बोलत होते.

पदवीधरचे माजी आ. सुधीर तांबे व त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीबाबत बोलताना आ. पटोले म्हणाले की, आम्ही पक्षातर्फे निवडणुकीआधीच सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यांना पुत्रासाठी उमेदवारी पाहिजे होती, तर त्यांनी तसे सांगितले पाहिजे होते. मात्र, त्यांनी तसे काही सांगितले नाही. पक्षातर्फे आम्ही दाेन कोरे एबी फॉर्मही पाठवले होते. उमेदवारीचा वाद त्यांचा कौटुंबिक विषय आहे. मी म्हणजे पक्ष नाही. पक्ष कोणाच्या घरचा नसतो तर कार्यकर्त्यांचा असतो, असेही आ. पटोले म्हणाले, जो पक्षादेश मानणार नाही, त्यास जागा दाखवून देऊ, असा इशाराही पटोले यांनी दिला. त्याचप्रमाणे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे जनतेच्या प्रश्नांवर न बोलता स्वत:च्या प्रश्नांवर बोलतात. त्यांनी स्वत:पेक्षा जनतेची काळजी करावी, असा टोलाही आ. पटोले यांनी लगावला. महाराष्ट्रातील प्रकल्प, घरकूल योजना, संग्रहालयातील प्राणी गुजरात राज्यात नेले जात असल्याने त्यावर प्रतिक्रिया देताना आ. पटोले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज सुरतेला लुटून महाराष्ट्राला द्यायचे. आता भाजप महाराष्ट्राला लुटून सुरतेला वाटत आहेत.

शिवसेना – वंचितला शुभेच्छा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर बोलताना आ. पटोले यांनी सांगितले की, आम्ही दोन्ही पक्षांना शुभेच्छा दिल्या आहेत. बाळासाहेब आंबेडकर यांचा प्रस्ताव आल्यानंतर त्यावर बोलू, असेही पटोले म्हणाले.

भाजपची शोकांतिका

या निवडणुकीत भाजपने उमेदवार का दिला नाही? त्यांचे नाशिक मतदारसंघात मतदार नाहीत का? भाजपची ही शोकांतिका नाही का? असे प्रश्न आ. पटोले यांनी उपस्थित केले. भाजपला दुसऱ्यांचे घर फोडायला आवडते. आमचे घर फुटल्याने आम्हाला वाईट वाटले आहे. ज्या दिवशी त्यांचे घर फुटेल त्या दिवशी त्यांना कळेल. जनताच त्यांचे घर फोडणार आहे, असेही आ. पटोले म्हणाले.

हेही वाचा : 

Back to top button