नाशिक : बालकाच्या अपहरण प्रकरणी चाैथा संशयित गजाआड
नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
येथील कांदा व्यापारी तुषार कलंत्री यांच्या बारावर्षीय मुलाचे अपहरण प्रकरणातील चौथ्या संशयितास पोलिसांनी अटक केली. या चारही संशयित आरोपींना सिन्नर न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 12 जानेवारीपर्यंत सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
येथील कांदा व्यापारी कलंत्री यांचा बारावर्षीय मुलगा चिराग याचे गुरुवारी (दि. 5) मारुती ओम्नी कारमधून अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर पोलिस पथक मागावर असल्याचे समजल्यानंतर घाबरलेल्या संशयितांनी चिरागला रात्री 1 च्या सुमारास पुन्हा घराजवळ आणून सोडले होते. या प्रकरणी पोलिसांनी रोशन नंदू चव्हाण, यश संदीप मोरे, आकाश भास्कर दराडे या तीन संशयितांना अटक केली होती. संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली ओम्नी कार, टाटा मांझा ही दोन चारचाकी वाहने आणि दोन दुचाकी जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दिली. त्यानंतर त्यांचा साथीदार संशयित राहुल रवींद्र वाणी (23) याला अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलिस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विजय माळी, राहुल निरगुडे, किरण पवार, चेतन मोरे, अंकुश दराडे अधिक तपास करीत आहेत.