नाशिक : वणी येथील ग्रामस्थांवर अंधारात अंत्यसंस्कार करण्याची वेळ
नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा
वणी येथील स्मशानभूमीत मुळ अंत्यसंस्कार ज्या ठिकाणी करण्यात येतात त्या ठिकाणी लाईट नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. अंधारात अंत्यसंस्कार करण्याची वेळ वणी ग्रामस्थांवर आली आहे.
स्मशानभूमी परिसरात बाहेर लाईट आहे परंतु ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार होतात तेथे अंधार असल्याने मोबाईल टॉर्चच्या लाईटमध्ये अंत्यसंस्कार विधी उरकण्याची वेळ आली आहे. २६ ऑक्टॉबर रोजी वणीतील नाभिक समाजाचे नाशिक जिल्हाध्यक्ष जगदीश सोनवणे यांच्या पत्नी सपना सोनवणे यांचा कोपरगाव येथे पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांच्यावर वणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीत लाईट नसल्याने अंधारात अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली.
एकीकडे शहरात सर्वत्र हायमास्ट चा लखलखाट तर दुसरीकडे अंत्यसंस्काराच्या ठिकाणी अंधार अशी परिस्थिती आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत तत्काळ दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्या अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या बाबत नवनियुक्त उपसरपंच विलास कड यांनी दखल घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या.
मागील दिड वर्षाच्या कालावधीत ग्रामपंचायतचा कारभार प्रशासक बघत होते. त्यांनी या दरम्यान गावातील मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. आता नवनियुक्त सरपंच व उपसरपंच यांनी तरी गावातील मूलभूत सोयी-सुविधेकडे लक्ष देऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.