उत्तर महाराष्ट्र : चाळीसगावात निसर्ग कोपला!!! | पुढारी

उत्तर महाराष्ट्र : चाळीसगावात निसर्ग कोपला!!!

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र भागात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. सोमवारी रात्री चाळीसगाव तालुका परिसरात झालेल्या पावसामुळे तितूर व डोंगरी नद्यांना पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात दोन जण अडकल्याचा अंदाज असून चाळीसगाव तहसिलदार अमोल मोरे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे एसडीआरएफ पथकाची मागणी केली.

त्याचबरोबर मन्याड प्रकल्प पूर्ण भरल्याने गिरणा नदीपात्र तसेच जामदा बंधार्‍यातून किमान १५०० क्यूसेक प्रवाह आहे. त्यामुळे तितूर, डोंगरी व गिरणा नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे तर कन्नड घाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून ही वाहतूक नांदगाव शिवूर बंगला मार्गाने वळविण्यात आली असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

जिल्ह्यात सोमवार रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे चाळीसगाव तालुक्यातील (उत्तर महाराष्ट्र) तितूर आणि डोंगरी नद्यांना पूर आला आहे. या पुरामुळे चाळीसगाव शहरातील नदीकाठच्या परिसरातील नागरी वसाहतीत पाणी शिरले आहे. या पुरात चाळीसगाव शहरातील दोन इसम अडकले असल्याचा अंदाज असून तीन ते चार गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. त्यामुळे तेथे संपर्क होऊ शकत नसल्याचे चाळीसगाव तहसिलदार अमोल मोरे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या संदेशात म्हटले आहे.

पुरात अडकलेल्या व्यक्तींच्या बचावासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची मदत मागविण्यासाठी अपर सचीव नियंत्रण कक्ष मंत्रालय तसेच जिल्हाधिकारी यांना संदेश देण्यात आल्यानुसार धुळे राज्य राखीव पोलिस बल तसेच एसडीआरएफ पथक पाठविण्याचे निर्देशानुसार मदत कार्य केले जात असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

कन्नड घाटात रात्रीच्या वेळी मुसळधार पावसामुळे दोन ते तीन ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. तर काही ठिकाणी झाडेदेखील उन्मळून पडली असून सर्वत्र दगडांचा खच व चिखल असल्याने अनेक वाहने रस्त्यात अडकली आहे. त्यामुळे कन्नड घाटात वाहतूक खोळंबली आहे. कन्नड औरंगाबादकडे तसेच चाळीसगाव शहराकडे सुमारे आठ ते दहा कि,मी. अंतरापर्यत वाहने खोळंबली आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद दल व स्थानिक वाहतूक पोलिस प्रशासनातर्फे मदत व बचाव कार्य केले जात आहे.

पहा व्हिडीओ : ओंकारेश्वर : एक अद्भुत ज्योतिर्लिंग

Back to top button