धुळे जिल्हा पोलीस दलाच्या सर्व धर्मीय समता तिरंगा रॅलीतून स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण | पुढारी

धुळे जिल्हा पोलीस दलाच्या सर्व धर्मीय समता तिरंगा रॅलीतून स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण

धुळे : पुढारी वृत्तसेवा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण आणि सर्व धर्मीय एकतेचे जनजागरण करत आज जिल्हा पोलीस दलाने सर्व धर्मीय समता तिरंगा रॅली काढली. या रॅलीत विद्यार्थ्यांसह नागरिकांनी देखील सहभागी होऊन देश प्रेमाचा जागर केला.

धुळ्याच्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानापासून या सर्व धर्मीय समता तिरंगा रॅलीला सुरुवात झाली. यात शीख धर्मगुरू बाबा धीरज सिंगजी, मौलाना शकील अहमद काजमी, फादर विल्सन रॉड्रीज, आचार्य महंत साळकर बाबा, महंत गोंदेकर, गुरुद्वाराचे रणवीर सिंह, रवींद्र सिंह रागे, जिल्हा विधि प्राधिकरणाचे सचिव संदीप स्वामी, माजी सैनिक युनूस शेख यांच्या सह सर्वधर्मीय प्रतिनिधी सहभागी झाले होते. या रॅलीला नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बि. जी. शेखर यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. यावेळी धुळ्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, राज्य राखीव दलाचे समादेशक प्रल्हाद खाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, आझाद नगर पोलीस ठाण्याचे आनंद कोकरे, तालुका पोलीस ठाण्याचे दत्तात्रय शिंदे, सायबर शाखेचे सतीश गोराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह पोलीस पथक सहभागी झाले होते.

यावेळी पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी सांगितले की, देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. भारतीय स्वातंत्र्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी आपले बलिदान दिले आहे. या सर्व स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण केले जावे, यासाठी जनजागृती केली जाते आहे. या निमित्ताने पोलीस दलाच्या माध्यमातून सर्व धर्मीय एकतेचा संदेश देण्याचे काम देखील केले जात आहे. त्यामुळे या रॅलीमध्ये सर्व धर्मीय धर्मगुरूसह विद्यार्थी आणि नागरिक यांनी देखील हजेरी लावली आहे. या समता तिरंगा रॅली बरोबरच शाळा स्तरावर देखील जनजागृती चे कार्यक्रम पोलीस दलाच्या माध्यमातून हाती घेतले जाणार आहे. या कार्यक्रमांमध्ये देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिका संदर्भातले जनजागृती केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button