Sharad Pawar : दोघांनाच सरकार चालविण्याचा आत्मविश्वास म्हणून मंत्रिमंडळ विस्तार नाही
नाशिक : पुढारी ऑनलाइन
जवळपास एक महिना झाला राज्याला मंत्री नाही. राज्यात पूरपरिस्थिती आहे. शेतकरी संकटात आहे. अशा परिस्थितीत काम करण्यासाठी मंत्री मंडळ टीम असणं आवश्यक आहे. मात्र, मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री या दोघांना आपण दोघेच सरकार चालवू असा आत्मविश्वास आहे. म्हणून मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याची उपरोधिक टीका शरद पवार यांनी केली आहे.
शरद पवार हे नाशिक दौ-यावर आहेत. त्यांनी पत्रकारांशी यावेळी संवाद साधला. राज्याचे विरोधी पक्ष नेते लोक संकटात आहेत अशा भागात भेटी देत आहेत. कोणतेही स्वागताचे व सत्काराचे कार्यक्रम घेण्यासाठी विरोधी पक्षांनी दौरा केलेला नाही. हा विरोधा भास तुम्हीच बघत आहे. यातून मुख्यमंत्री यांनी बोध घ्यावा असा सल्ला ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिला.
पवार यांना मालेगाव जिल्हा निर्मिती बाबत विचारले असता यावर राज्यातील सरकार एक दोन दिवसांत निर्णय घेईलच तेव्हा बघू असे पवार म्हणाले. यावेळी सरकार पडेल किंवा नाही किंवा निवडणुका लागतील किंवा नाही हे सांगायला मी ज्योतिष नाही. मात्र निवडणुका कधीही लागल्या तरी आम्ही तयार आहोत असेही शरद पवार यांनी म्हटले.
न्यायालयाने ओबीसी आरक्षणावर दिलेला निर्णय चिंताजनक आहे. यातून ओबीसी सारखा मोठा वर्ग नाराज होईल, हा वर्ग सत्तेबाहेर जातो की काय अशी भीती याने निर्माण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडी करायची की नाही हे नंतर बघू आगोदर ओबीसी बाबत निर्णय होऊ द्या असे पवार यांनी सांगितले. आपले संघटन खीळखीळे झाले आहे का असे विचारले असता यावर बोलताना पवार म्हणाले ज्या वेळेस निवडणुका लागतील तेव्हा जनता कौल देईल.