मुंबईकरांची तहान भागणार ; अप्पर वैतरणा ओव्हरफ्लो | पुढारी

मुंबईकरांची तहान भागणार ; अप्पर वैतरणा ओव्हरफ्लो

देवगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्वात महत्त्वाचे अप्पर वैतरणा धरण 80 टक्के भरले असून, रविवारी (दि. 24) ओव्हरफ्लो झाल्याने मुंबईकरांची तहान भागणार आहे. रविवारी एका सांडव्याचे गेट एक फूट उचलत 610 क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला असून, कालव्याद्वारे 400 क्यूसेकने विसर्ग करण्यात आला. धरण भरल्याने मुंबईकरांसह वैतरणा परिसरातील नागरिक व शेतकर्‍यांची चिंता अखेर दूर झाली.

जुलै महिन्यात धरण क्षेत्रात मुसळधार पावसासह संततधार सुरू असल्याने रविवारअखेर अप्पर वैतरणा धरण दुपारी दोन वाजता ओव्हरफ्लो होऊन 89 टक्के भरले. त्यानंतर सांडव्याद्वारे तसेच कालव्याद्वारे विसर्ग सुरू करण्यात आला. दरम्यान धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू असून, धरणामध्ये पाण्याची आवक सुरूच आहे. आवक वाढल्यास सांडव्याद्वारे आणखी विसर्ग वाढवण्यात येऊ शकतो, असा अंदाज असून, त्या द़ृष्टीने वैतरणा पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता श्रेणी 1 नीलेश वन्नेरे, शाखा अभियंता योगेश निकुंबे आदींसह कर्मचारी लक्ष ठेवून असून, योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

अप्पर वैतरणा धरण परिसर पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात परिसराकडे पाठ फिरवली होती. अप्पर वैतरणा परिसरात यावर्षी पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरून कोसळणार्‍या पाण्यामुळे छोटे-मोठे अनेक धबधबे बघायला मिळतात. धबधब्यांसह धुके व संपूर्ण परिसर हरित झाल्याने या परिसराचे आकर्षण कायम आहे.

अप्पर वैतरणा धरणाची स्थिती
पाणी पातळी 1979. 65 फूट
उपयुक्त साठा 327.06 द.ल.घ.मी.
एकूण साठा 349.71 द.ल.घ.मी.
टक्केवारी 89

हेही वाचा :

Back to top button