जळगाव : 'तू जाड आहेस', भावी पतीने हिणवल्यामुळे तरुणीची आत्महत्या
जळगाव, पुढारी वृत्तसेवा : ‘तू जाड आहेस, मला आवडत नाही. मामांनी सांगितले म्हणून होकार दिला, पण मी हे लग्न मोडणार आहे. आता लग्न कुन्हे गावात नाही, तर भुसावळात लॉनवर करायचे’, अशा भावी पतीकडून येणाऱ्या धमक्या आणि अपमानाला कंटाळून लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधीच तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide )केल्याची धक्कादायक घटना घडली. रामेश्वरी रवींद्र नागपुरे ( वय २४, रा. कुन्हे, पानाचे, ता. भुसावळ) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
रामेश्वरीसारख्या उच्चशिक्षित तरुणीने घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याने संताप व्यक्त होत आहे. तिचा लग्न ठरलेला पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका नातेवाइकांनी घेतली. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
याबाबत अधिक माहिती अशी, शुक्रवारी रामेश्वरीचे आई -वडील शिरसोली येथे लग्नाला गेले होते. तर रामेश्वरी भुसावळ येथे जीमला गेली होती. दुपारी घरी आल्यावर तिने वडिलांना फोन केला. चार वाजता आई -वडील घरी आले असता आतून दरवाजा बंद होता. आवाज देऊनही रामेश्वरी दरवाजा उघडत नसल्याने तिचा चुलत भाऊ जीवन व इतरांनी दरवाजा तोडला. त्यावेळी आत रामेश्वरीने ओढणीने गळफास घेतल्याचे दिसून आले. दरम्यान, होणाऱ्या पती व सासू यांच्याकडून होणारा छळ, असह्य टोमणे व अवास्तव अपेक्षा यामुळेच मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप करून तिच्या वडिलांनी भुसावळ पोलिसांत लेखी तक्रार दिली. तेथून मृतदेह जळगावला शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. शनिवारी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शवविच्छेदन रोखण्यात आले होते.पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
१८ मे राेजी हाेणार हाेता विवाह
कुन्हे पानाचे येथील रामेश्वरी नागपुरे हिचे रावेर येथील भूषण याच्याशी लग्न ठरले होते. ६ मार्चरोजी साखरपुडा झाला होता. १८ मे रोजी विवाहाचा मुहूर्त काढला होता. हुंडा म्हणून ३ तोळे सोने व ५० हजार रुपये रोख लग्नाच्या दिवशी देण्याचे ठरले होते. परंतु साखरपुडा होताच काही दिवसांनी भूषण व त्याच्या आईकडून दागिने व पैशांचा तगादा सुरू झाला. गेल्या आठवड्यात ‘आम्ही जळगावात आलो आहोत, आम्हाला आजच दागिने व रोख रक्कम द्या’, म्हणून सांगितले. त्यासाठी रावेर येथे बोलावले. तेथे दागिने व रोख रक्कम दिली.
‘आता काय उपयोग जीम लावून’
त्यानंतर दोन-तीन दिवसांत पुन्हा भूषणकडून रामेश्वरी हिला हिणवणे सुरू झाले. तू जाड आहेस, मला आवडत नाही. मामांनी सांगितले म्हणून होकार दिला; पण मी हे लग्न मोडणार आहे. आता लग्न कुन्हे गावात नाही तर भुसावळात लॉनवर करायचे, असे सांगत होता. जाड म्हणून हिणवत असल्याने रामेश्वरी हिने भुसावळात जीम लावली. तेथील फोटो तिने भूषणला पाठविले. त्यावर त्याने आता काय उपयोग जीम लावून असे बोलून खच्चीकरण करीत होता. प्रत्येकवेळी भूषण व त्याच्या आईच्या अपेक्षा वाढतच होत्या, शुक्रवारी रात्रीदेखील दोघांमध्ये बोलणे झाले होते, अशी माहिती रामेश्वरीचे चुलत भाऊ जीवन नागपुरे यांनी सांगितले.
हेही वाचलंत का ?
- बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यावर हल्ला
- पुणे : बाजार समिती संघावर महाविकास आघाडीचे वर्चस्व ; २१ पैकी १७ जागांवर विजय
- रत्नागिरी : विजेचा धक्का बसून वायरमनचा जागीच मृत्यू