

मुंबई : 16 वर्षांपूर्वी कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणात दोन पोलीस अधिकार्यांना विशेष सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आरोपी पोलिस अधिकार्यांनी कैद्याचा पोलीस कोठडीत छळ केल्याचे सिद्ध झाले. त्याआधारे न्यायालयाने संबंधित पोलिस अधिकार्यांना सात वर्षांचा तुरुंगवास आणि प्रत्येकी 62,000 रुपयांचा दंड ठोठावला. दंडाच्या रक्कमेपैकी 1 लाख रुपये मृत अल्ताफ शेखच्या आईला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
कोठडीतील कैद्याचा छळ करण्यात आला. त्यात त्या कैद्याचा 11 सप्टेंबर 2009 रोजी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या संजय खेडेकर (55) आणि रघुनाथ कोळेकर (62) या दोघा पोलिस अधिकार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच सीबीआयने तिसर्या पोलिस कर्मचार्यावरही गुन्हा दाखल केला होता. परंतु तिसर्या आरोपीचा खटला प्रलंबित असतानाच 2023 मध्ये मृत्यू झाला.
भारतीय दंड संहितेच्या कलम 330 अंतर्गत कबुली जबाब देण्यासाठी किंवा मालमत्ता परत मिळवण्यासाठी स्वेच्छेने दुखापत करणे या आरोपाखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर खेडेकर आणि कोळेकर यांना कधीही अटक करण्यात आली नाही. दरम्यान, या प्रकरणातील सबळ पुराव्यांच्या आधारे दोन्ही आरोपी पोलिसांचे दोषत्व सिद्ध झाले.
विशेष सीबीआय न्यायालयाने त्यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेसह प्रत्येकी 62 हजार रुपयांच्या दंडाचा दणका दिला. अल्ताफ शेखचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आणि आरोपींना हत्येच्या आरोपातून मुक्त केले. मात्र शेखवर कोठडीत हल्ला झाला होता हे सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्यांना सात वर्षांचा तुरुंगवास दंडाची शिक्षा ठोठावली.