

CM Devendra Fadnavis on Shaktipeeth Expressway
मुंबई : शक्तिपीठ महामार्ग मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बुधवारी (दि.२५ जून) राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. ''शक्तिपीठ महामार्गाला काही लोकांचा विरोध आहे. आम्ही त्यांच्याशी संवाद साधू. पण जे राजकीय विरोध करतील त्यांना आम्ही बदणार नाही,'' असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेसचा विकासकामांना आधीपासूनच विरोध आहे. समृद्धी महामार्गाला विरोध करणारी हीच माणसे होती. मी कोल्हापूरला गेलो होतो. कोल्हापूरच्या विमानतळावर शेतकऱ्यांनी मला घेराव घातला. आमचे सात-बारा बघा, असे शेतकरी त्यावेळी म्हणाले होते. त्यांना शक्तिपीठ महामार्ग झालेला हवा आहे. पण काही लोकांचा विरोध आहे. पण संवादाने हा विषय मार्गी लावू, असे फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
विधानसभा निवडणुकांपूर्वी शक्तिपीठ महामार्गास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील शेतकर्यांनी तीव्र विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या महामार्गात बदल करण्याबाबत भूमिका घेतली होती. मात्र, मंगळवारी (दि.२४ जून) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ८०२ किलोमीटर लांबीच्या या द्रुतगती मार्गाला मंजुरी देण्यात आली.
देशात सर्वांत जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. सर्वात जास्त स्टार्ट अप, लघू उद्योग, जीडीपी असलेला आणि निर्यात करणारा महाराष्ट्र झाला आहे. २०२२ नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र एफडीआयमध्ये नंबर वन झाला आहे. राज्यात गुंतवणूक वाढविण्यासाठी महाराष्ट्र उद्योग संवाद आयोजित केला आहे. यात उद्योजक व तत्सम व्यक्तींचा संवाद असेल. गडचिरोली ही स्टील सिटी म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न आहे. सातत्याने गडचिरोलीमध्ये उद्योग वाढावे म्हणून प्रयत्न करत आहोत. एक तृतीयांश क्षमता ही गडचिरोलीत होत आहे. गडचिरोलीत १ कोटी झाडे लावण्याचा आमचा प्लान आहे. या भागात मशिनरी आणि ट्रक्स हे पर्यायी इंधनावर चालवण्याचा प्रयत्न आहे. आज आपण त्या दिशेने चाललोय. येथील पर्यावरण सांभाळून गडचिरोलीचा विकास केला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
'एखादा व्यक्ती रोज खोटे बोलत असेल. लोकांना त्यांचे बोलणे खरेही वाटेल. ये पब्लिक है सब जानती है... पण आम्ही त्यांना पुराव्यानिशी तोंडावर पाडतोय', अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली आहे.