पुढारी ऑनलाईन डेस्क : मला मुख्यमंत्री पदाचा कोणताही हाव नाही. आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलो आहेत. निवडणुकांत सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळावे, असे माझे मत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोणाचाही असो, माझा त्याला पाठिंबाच असेल. यासाठी काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, असे मत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray MVA Melava) यांनी स्पष्ट केले. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या महामेळाव्यात बोलत होते. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आज (दि.१६ ऑगस्ट) मविआचा महामेळावा होत आहे.
पुढे बोलताना ठाकरे बोलत होते, लोकसभेला महाविकास आघाडीने शत्रुला पाणी पाजले परंतु विधानसभेची लढाई सोपी नाही. आजपासून लढाईला सुरूवात झाली आहे. यासाठी आपल्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये झालेली चांगली कामे लोकांसमोर ठेवली पाहिजे, असे आवाहन देखील त्यांनी मविआ नेते, कार्यकर्त्यांना केले आहे.
केंद्र सरकार राज्यांतील विधानसभा मुद्दामहून पुढे ढकलत आहेत. चला होऊन जाऊ द्या, एक तर तू राहशील किंवा मी मग होऊन जाऊदे, असे खुले आव्हान ठाकरे यांनी महायुतीला दिले आहे. आम्हाला भारत सरकार पाहिजे, मोदी सरकार नको असा उल्लेखही त्यांनी केला. त्यामुळे निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर करा अशी मागणी ठाकरे यांनी या मेळाव्यात ठाकरे यांनी केली आहे.