आरोग्यमंत्री राजेश टोपे : लॉकडाऊन नाही; तूर्त कठोर निर्बंध | पुढारी

आरोग्यमंत्री राजेश टोपे : लॉकडाऊन नाही; तूर्त कठोर निर्बंध

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली, तरी तूर्तास लॉकडाऊन लावला जाणार नाही. कोरोना रुग्णवाढीचा दर पाहता नवे कडक निर्बंध लावले जातील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली. आरोग्य विभाग व टास्क फोर्सच्या बैठकीचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. एक-दोन दिवसांत नव्या निर्बंधांची नियमावली जाहीर होईल, असेही टोपे यांनी सांगितले.

राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ओमायक्रॉनवरील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात बुधवारी सकाळी बैठक झाली. यावेळी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव, टास्क फोर्सचे सदस्य आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना टोपे यांनी सांगितले की, लॉकडाऊन लावला, तर पुन्हा राज्याच्या अर्थचक्रावर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे तूर्तास तरी लॉकडाऊन नकोच, अशा निष्कर्षाप्रत राज्य सरकार आले आहे. आजच्या बैठकीतही त्या मुद्द्यावर एकमत झाले. विषाणूवर नियंत्रण मिळवायचे असेल, तर कोणत्याही परिस्थितीत गर्दी थांबवणे गरजेचे आहे, असे मत प्रशासन व टास्क फोर्सने व्यक्‍त केल्याचे टोपे यांनी सांगितले. मंत्रालयातल्या या बैठकीचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. याबाबत ते अधिक माहिती घेतील आणि एक-दोन दिवसांत नव्या निर्बंधांबाबतची नियमावली जारी केली जाईल, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर

रुग्णवाढ आटोक्यात आणण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देत चाचण्यांची संख्या वाढवा. सौम्य लक्षणे असणार्‍या कोरोनाबाधित रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवताना आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून योग्यप्रकारे उपचार आणि देखरेख करण्यात यावी. लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे, कोरोनाची गंभीर लक्षणे असणार्‍या रुग्णांना रुग्णालयात प्राधान्याने बेड उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्याचेही टोपे यांनी सांगितले.

रुग्णालये सज्ज ठेवा : पवार

राज्यातील सर्व कोव्हिड जम्बो सेंटर, कोव्हिड हेल्थ सेंटर व समर्पित कोव्हिड रुग्णालये सज्ज ठेवावीत, अशा सूचना अजित पवार यांनी बैठकीत केल्या. अत्यावश्यक औषधांचा तुटवडा नको तसेच आरोग्य यंत्रणेत आवश्यक मनुष्यबळासंदर्भात आढावा घेऊन त्यासंदर्भात नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.

क्‍वारंटाईनचा कालावधी 7 दिवसांचा : टोपे

कोरोना चाचण्या वाढवणार आहोत. केवळ आरटी-पीसीआर चाचणी केली, तर प्रयोगशाळांवर अतिरिक्‍त भार पडेल. तो टाळण्यासाठी अँटिजेन टेस्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अँटिजेन चाचणी पॉझिटिव्ह आल्यास आरटी-पीसीआर चाचणी करण्याची गरज नसेल. क्‍वारंटाईनचा कालावधी 7 दिवसांचा राहील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

लॉकडाऊन शब्द नकोच

यापुढे लॉकडाऊन हा शब्दप्रयोग करायचाच नाही. कारण, सर्व काही 100 टक्के बंद करण्याची गरजच भासणार नाही, असा मतप्रवाह बैठकीत व्यक्‍त झाला.

अनावश्यक सेवा मुंबईत बंद होणार

खासकरून मुंबईसारख्या शहरातील परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवून बिगर अत्यावश्यक सेवा थांबवण्याचा विचार सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष

आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे राज्याचे लक्ष आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई, ठाण्यासाठी निर्बंधांचा वेगळा निर्णय घ्यावा लागेल.

Back to top button