काँग्रेस : भाजपविरोधात लढाई अहंकाराने नाही, एकजुटीने लढावी | पुढारी

काँग्रेस : भाजपविरोधात लढाई अहंकाराने नाही, एकजुटीने लढावी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्ष हा देशाच्या लोकशाहीसाठी धोका आहे. भाजपच्या हुकूमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहे. त्यामुळे वैयक्तिक महात्त्वाकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून, भाजपविरोधातील लढाई अहंकाराने नाही, तर एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे. एका राज्यापुरता मर्यादित राजकीय पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर बुधवारी केली.

मुंबई दौर्‍यावर आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पटोले म्हणाले की, सत्ता, पैसा आणि स्वायत्त संस्थांचा गैरवापर करून भारतीय जनता पक्षाने देशाच्या लोकशाहीला संपविण्याचे प्रयत्न चालवले आहेत. भाजपच्या या हुकूमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहे. भूसंपादन कायद्यातील बदल आणि तिन्ही कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर शेतकर्‍यांच्या पाठीशी राहुल गांधी खंबीरपणे उभे राहिल्याचे पटोले म्हणाले.

काँग्रेस नेतृत्वाला प्रशस्तिपत्र नको

स्वातंत्र्यपूर्व लोकशाही व संविधानाबद्दलची कटिबद्धता आणि विद्यमान केंद्र सरकारविरोधातील संघर्षाबाबत काँग्रेसला आणि काँग्रेस नेतृत्वाला कोणाच्याही प्रशस्तिपत्राची आवश्यकता नाही, असे प्रत्युत्तर काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी ममता बॅनर्जी यांना दिले.स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत नेहमीच काँग्रेसने सर्वसामान्यांसाठी प्रामाणिकपणे लढा दिला. केंद्र सरकारचा लोकविरोधी भूसंपादन कायदा व तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याबाबत आणि इतर अनेक प्रश्नांवर काँग्रेसची आक्रमक भूमिका देशाने पाहिली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली हा लढा भविष्यात अधिक नेटाने लढला जाईल, असे चव्हाण म्हणाले.

एका राज्यापुरता मर्यादित पक्ष भाजपला पर्याय नाही

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेला बाजूला ठेवून राष्ट्रहितासाठी, लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी सर्व समविचारी राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन लढा देण्याची वेळ आली आहे. एका राज्यापुरता मर्यादित राजकीय पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही. काँग्रेस हाच भाजपला सक्षम राजकीय पर्याय आहे, असे नाना पटोले म्हणाले.

Back to top button