वेळ काढून कायदा टाळता येत नाही, फडणवीसांची ठाकरेंवर टीका | पुढारी

वेळ काढून कायदा टाळता येत नाही, फडणवीसांची ठाकरेंवर टीका

मुंबई : पुढारी ऑनलाईन : धनुष्यबाण चिन्हावरुन ठाकरे आणि शिंदे गटात संघर्ष सुरु आहे. याचदरम्यान उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेने जेवढा वेळ मागितला तेवढा वेळ निवडणूक आयोगाने त्यांना दिला. त्यांना एक, दोन, चार आठवडे असा मागील तेवढा वेळ दिला. पण वेळ काढून कायदा टाळता येत नाही. त्याला समोरे जावे लागेल, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवले आहे. यामुळे शिंदे आणि ठाकरे गटाला शिवसेनेचे नाव पुढील आदेशापर्यंत वापरता येणार नाही. या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने याचिका दाखल केली आहे. चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या, अशी मागणी शिवसेनेने याचिकेतून केली आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह आणि नाव गोठवल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी काल रविवारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गद्दारांनी पक्ष फोडला, भाजपशी युती करुन सत्ता स्थापन केली आणि शिवसेनेला संपविण्याचे कारस्थान सुरु केले. शिवसेनाप्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून हे सर्व कारवाया केल्या इथेपर्यंत ठीक होतं. पण, या गद्दारांनी आता या शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवण्याचे पाप केल्याची टीका यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटावर नाव न घेता केली. यावेळी त्यांनी ४० डोक्यांच्या रावणीने प्रभू श्री रामाचं धनुष्यबाण गोठवलं अशी टीकाही त्यांनी केली.

जो निवडणूक आयोगाने निकाल दिला तो निकाल अपेक्षित नव्हता. आम्ही कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली होती. कायद्याप्रमाणे हा निकाल अपेक्षित नव्हता. पण, आपण सर्वोच्च न्यायालायत गेला आहोत. तेथे आपल्या नक्की न्याय मिळेल. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. शिवसेनेला न्याय मिळेल. आयोगाच्या निकालामुळे मी डगमगलो नाही. माझ्यात आत्मविश्वास ठासून भरलेला आहे. मी शिवसैनिकांसोबत आहे आणि येणाऱ्या आव्हानला सामोरे जावू असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा :

Back to top button