राज्यात निर्बंध उठवण्यासाठी सरकारचा “वाटाघाटीचा” नवा धंदा! : आशिष शेलार | पुढारी

राज्यात निर्बंध उठवण्यासाठी सरकारचा "वाटाघाटीचा" नवा धंदा! : आशिष शेलार

मुंबई पुढारी वृत्तसेवा : ठाकरे सरकारने निर्बंधाचा नवीन धंदा सुरू केलेला आहे, वाटा मिळाला की निर्बंध शिथिल होतात, जिथे घाटा आहे तिथे निर्बंध कडक राहतात म्हणून रेस्टॉरंटवाले, बारवाले, भेटले “वाटाघाटी” झाल्या. वाटा मिळाला की, निर्बंधात शिथिलता दिली जाते. तर दुसरीकडे घाट्यात असलेले मराठी कलावंत, नाटक कलावंत, मराठी लोककलावंत, धुप कापूर विकणारे हे घाट्यात आहेत, वाटाघाटी करु शकत नाहीत, वाटा देऊ शकत नाहीत म्हणून त्यांच्यावर निर्बंध लादले गेले आहेत. त्यांची उपासमार सुरु आहे, हा वाटघाटीचा धंदा बंद करा, आता गणेशोत्सव, नवरात्र मंडळांसोबत पण शिवसेना वाटघाटी करणार का? असा सवाल करीत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी आज ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागली.

राज्यसभा सदस्यांचा जावई सरकारच्यावतीने वाटाघाटी करतो

राज्यातले थिएटर सुरू करण्यासाठी सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडीतला एक राज्यसभा सदस्यांचा जावई सरकारच्यावतीने वाटाघाटी करतो आहे. वाटाघाटी करा मग निर्बंध शिथिल करु असा धंदा सुरू आहे. शिवसेनेच्या राज्यसभा सदस्याच्या जावयाने हे धंदे बंद करा, अन्यथा आम्ही नाव जाहीर करु, असा गर्भित इशारा ही यावेळी आमदार अँड आशिष शेलार यांनी दिला आहे.

आमदार अँड आशिष शेलार यांनी वांद्रे येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, काल दिवसभर गोविंदाला नोटीस काय, धरपकड काय, बळाचा वापर काय, अटक काय, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात आणि मुंबईत घडल्या, जणू काही सुलतानी पद्धतीचा कारभार सुरु होता.

म्हणून मुख्यमंत्री महोदयांना आम्ही आठवण करून देतो, ज्यावेळी सचिन वाझेचा प्रश्न सभागृहात आम्ही मांडला, करोडोंची वसुली केल्यानंतर ज्यावेळी आम्ही प्रश्न उपस्थित केला. तर तुम्ही म्हणाला होतात की, सचिन वाझे लादेन आहे काय? म्हणून आज आमचा सवाल आहे तुम्हाला, हे गोविंदा काय लादेन आहेत काय?

ज्या पद्धतीने बळाचा वापर करून, अटक करून, धरपकड करून, नोटीस देऊन, केसेस टाकताय म्हणून हा सवाल आम्ही तुम्हाला विचारतोय. असही अँड आशिष शेलार म्हणाले.

गेल्या दीड पावणे दोन वर्षांमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने, ठाकरे सरकारने, सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत, पावणे दोन वर्षात महाराष्ट्राला बंदीवान केल्याचा रेकॉर्ड हा उद्धवजी ठाकरे यांच्या नावावर लिहिला जाईल, असे दुर्दैवी चित्र आहे.

तुमच्या पक्षाच्या विधानपरिषदेच्या आमदारांना रांग तोडून अगोदर लस कशा मिळाल्या?

माननीय मुख्यमंत्री महोदय, म्हणत आहेत, आमचा सणांना विरोध नाही आमचा करोनाला विरोध आहे. गर्दी जमू नये असे वाटते मग मुंबईतले राज्यातले रेस्टॉरंट, बार, पब, येथे जमणाऱ्या गर्दीचे काय?

आज आम्हाला केंद्राचे पत्र दाखवताय केंद्राच्या पत्रात बार, पब इथे गर्दी होणार नाही असे म्हटलेय का? आणि म्हणून केंद्राच्या पत्रकावरच तुम्ही राजकारण करणार असाल तर, केंद्राने तुम्हाला सांगितलं होतं टेस्ट वाढवा, वाढवल्यात का? मृत्यूचे आकडे लपवू नका, काय केलेत? केंद्राने सांगितलं होतं की, लसी समप्रमाणात राज्यभर द्या, मग जालन्याला सगळ्यात जास्ती लसी का गेल्या? ठाण्याच्या महापौरांनी आणि तुमच्या पक्षाच्या विधानपरिषदेच्या आमदारांना रांग तोडून अगोदर लस कशा मिळाल्या?

केंद्राने सांगितल्याप्रमाणे आरोग्य सेवकांचे लसीकरण संपूर्ण करा, अद्यापही हे झालेले नाही. केवळ सिलेक्टीव्ह राजकारण करू नका.

सन 2019 पर्यंत शिवसेनेची घोषणा होती, “पहिले मंदिर बादमें सरकार” तर 2021 ला शिवसेनेची घोषणा बदलली आणि ” पहिले मदिरालय बाद मे मंदिर!” असा सणसणीत टोला आमदार अँड आशिष शेलार यांनी लगावला.

स्वतंत्र्याचा अमृतमहोत्सव आहे. हे 75 वेळा बोलावे!

कालच्या मुख्यमंत्र्यांचा आधार घेत अँड शेलार म्हणाले की, स्वातंत्रता आंदोलनाबद्दल तर मुख्यमंत्र्यांनी बोलूच नये, अगोदर 75 वेळा हा भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आहे. हा भारत स्वतंत्र्याचा अमृतमहोत्सव आहे. हे 75 वेळा बोलावे! असा उपरोधिक टोला अँड आशिष शेलार यांनी लगावला.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या सरकारच्या भूमिकेच्या बाजूने भाजपा आहे, पण निर्बंधांमध्ये वाटाघाटी करून निर्बंधाचा धंदा करण्याच्या सिलेक्टीव्ह कामामध्ये आम्ही बरोबर नाही. आम्ही त्या विरोधात आहोत. आमची भूमिका स्पष्ट आहे, नियम नियमावली करून मंदिर उघडा, प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी घेऊन, त्याचे नियम करून गणेशोत्सव साजरा करू द्या.

हिंदु सणांवर आक्रमण बंद करा. एका विशिष्ट वर्गाची मत मिळायला लागल्यापासून गेल्या तीन-चार वर्षांपासून शिवसेनेने हे काम सुरू केले आहे. याची सुरुवात बेहराम पाड्यापासून झाली आहे.

या बेहराम पाड्यात शिवसेनेचा नगरसेवक निवडून आला आणि सर्वे मध्ये एका विशिष्ट वर्गाची मते मिळत आहेत असे दिसू लागल्यावर शिवसेनेने एका विशिष्ट वर्गाचे लांगुलचालन सुरु केले आहे. लालबाग, परळ आणि महाराष्ट्रातील जनतेकडे दुर्लक्ष केले आहे. तुम्हाला तुमचे राजकारण लखलाभ सामान्य जनतेसाठी आम्ही आवाज उठवत राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

खा.संजय राऊत यांना अंतर्गत धोका असावा

खा. संजय राऊत यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे चांगले आहे. ते नेते आहेत, संपादक आहेत. नेहमी पुढे बोलताना दिसतात, त्यामुळे पक्ष कोण चालवतो हेही दिसतेय. बहुतेक त्यामुळेच त्यांना बाहेरून नाही तर अंतर्गत धोका असावा म्हणून त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली असावी, टोला अँड आशिष शेलार यांनी लगावला.

हे ही वाचलत का :

एक एकर टोमॅटो शेतीसाठी खर्च किती आणि हातात मिळतात किती ?

Back to top button