मातोश्री ते कल्याण-डोंबिवली व्हाया ठाण्याची अडथळा ठरलेली भिंत उद्ध्वस्त | पुढारी

मातोश्री ते कल्याण-डोंबिवली व्हाया ठाण्याची अडथळा ठरलेली भिंत उद्ध्वस्त

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : मातोश्रीवर जाण्याआधी असलेली ठाणे ही शिवसैनिकांसाठी भिंत आता उद्ध्वस्त झाली आहे. शिवसेना हीच आमच्या हृदयातली भावना मातोश्रीवर जाऊन आलेल्या शिवसैनिकांनी व्यक्त केली. डोंबिवलीतील शेकडो शिवसैनिकांनी शनिवारी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

शिवसेनेच्या डोंबिवली मध्यवर्ती शाखेत उपशहर प्रमुख विवेक खामकर, कल्याण-डोंबिवली महानगर संघटक वैशाली दरेकर, विधानसभा संघटक कविता गावंड, शहर संघटक मंगला सुळे, किरण मोंडकर, कार्यालयप्रमुख सतीश मोडक, उपशहर संघटक स्मिता पाटील, ममता घाडीगावकर, अल्पा चव्हाण, अनिता मयेकर, उपविभाग प्रमुख अभय घाडीगावकर, शिल्पा मोरे आदींसह अनेक शिवसैनिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीदरम्यान डोंबिवलीतील शिवसैनिकांनी चर्चा केली. यावेळी ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, जे शिवसेना सोडून गेले त्यांच्याबाबत विचार न करता पुन्हा नव्या जोमाने कामाला लागा. पालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह अन्य कुणालाही हिरावून घेता येणार नाही. सामान्य जनता शिवसेनेबरोबरच आहे, असा विश्वासही ठाकरे यांनी डोंबिवलीकर शिवसैनिकांशी बोलताना व्यक्त केला. याबाबत अधिक माहिती देताना उपशहरप्रमुख विवेक खामकर म्हणाले, आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत. आम्ही कायम शिवसेनेबरोबरच राहणार. आम्हाला मातोश्रीवरून जो आदेश येईल त्याचे पालन करू.संघटक कविता गावंड म्हणाल्या, नगरसेवक, आमदार, खासदार हे काही वर्षांपुरते मर्यादित असतात. परंतु संघटना कायम राहते. आज शिवसैनिक आणि सामान्य जनता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहे.

Back to top button